पुणे सहसंपादक – गोपाळ भालेराव. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज आर्वी विधानसभा मतदारसंघातील 10 विविध विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन पार पडले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केले व वर्धा जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींचे या विकासकामांसाठी अभिनंदन केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आर्वी विधासभा मतदारसंघातील विकासकामांसाठी आ. सुमित वानखेडे सातत्याने प्रयत्न करत असून त्यांनी मागणी केलेल्या उपसा सिंचन योजने संदर्भातील मागणीला आगामी काळामध्ये मान्यता देऊन शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी देण्याचे काम करणार आहोत. तसेच त्यांनी केलेल्या प्लग-अँड-प्ले एमआयडीसीच्या मागणीचा प्रस्ताव एमआयडीसीला पाठवला असून यामुळे वर्धा जिल्ह्यातील तरुणांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
समृद्धी महामार्ग आणि शक्तीपीठ महामार्गाच्या माध्यमातून वर्धा जिल्हा आता मध्य भारताचा लॉजिस्टिक केंद्र म्हणून उदयास येत आहे. या जिल्ह्याची जोडणी नव्याने विकसित होणाऱ्या वाढवण बंदरासोबत केली जाणार असून, यामुळे शेतकरी, उद्योजक तसेच स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीस चालना मिळेल. तसेच दावोस करारातून ₹7 लाख कोटींची गुंतवणूक विदर्भात आली, ही आनंदाची बाब आहे, असे ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मिर्झापूर (नेरी) या गावाला सौर ऊर्जा ग्राम मान्यता मिळाली आहे. पुढील काळात प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेला महाराष्ट्र सरकारची जोड देऊन 300 युनिट पर्यंत वीज वापरणाऱ्या घरांना सौर ऊर्जेच्या माध्यमातून मोफत वीज पुरवण्याची योजना राज्यभरात राबवली जाणार आहे. तसेच 2026 च्या डिसेंबरपर्यंत राज्यातील शेतकऱ्यांना दिवसा मोफत वीज उपलब्ध करून देण्याचे लक्ष्य सरकारने ठेवले आहे. यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन खर्च कमी होतील आणि सौर ऊर्जेचा प्रसार मोठ्या प्रमाणात होईल, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून विहीर पुनर्भरणासाठी अनेक उपयुक्त योजना राबवण्यात आल्या असून, त्याचे सकारात्मक परिणाम येत्या पावसाळ्यात निश्चितपणे दिसून येतील. देशातील अनेक राज्यांमध्ये पाण्याचा अनियमित उपसा केल्यामुळे दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. ही समस्या सोडवण्यासाठी सौर कृषी वाहिनीच्या माध्यमातून विजेची बचत व सौर ऊर्जेची निर्मिती केली जात आहे. यामुळे 2025 ते 2030 या कालावधीत विजेचे बिल मोठ्या प्रमाणात कमी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच, प्रधानमंत्री मोफत सूर्यघर योजना प्रभावीपणे राबवली गेल्यास विजेच्या तुटवड्याचा प्रश्न निर्माण होणार नाही. याशिवाय, निम्न वर्धा प्रकल्पावर 500 मेगावॅट क्षमतेच्या सौरऊर्जेच्या निर्मितीचे काम सुरु असून, त्याद्वारे वर्धा जिल्हा लवकरच सौर ऊर्जेत पूर्णपणे स्वयंपूर्ण बनेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत महाराष्ट्राला 20 लाख घरांचे लाभ मिळाले असून त्यातील 18 लाख घरे सध्या बांधकामाच्या प्रक्रियेत आहेत. आता या योजनेत प्रत्येक लाभार्थ्याला ₹50,000 ची अतिरिक्त रक्कम मिळणार असून, यामधील प्रत्येक घरावर सौरऊर्जेची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. यासोबतच, वैनगंगा-नळगंगा प्रकल्पाचे सर्वेक्षण पूर्ण झाले असल्याचेही त्यांनी सांगितले. या प्रकल्पामुळे गडचिरोलीसह संपूर्ण पूर्व विदर्भातील भाग देशासाठी आवश्यक असणाऱ्या स्टीलच्या निर्मितीसाठी महत्त्वपूर्ण केंद्र ठरेल, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
व्याघ्र प्रकल्प भागात वाघांचे हल्ले रोखण्यासाठी AI तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येईल, व इतर जंगली प्राण्यांमुळे शेतीस होणारे नुकसान टाळण्यासाठी सोलर कुंपण योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
यावेळी राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, खा. अमर काळे, आ. सुमित वानखेडे, आ. राजेश बकाने, आ. समीर कुणावार, आ. दादाराव केचे, माजी खासदार रामदास तडस व इतर मान्यवर उपस्थित होते.
