पुणे मनपा शाळा,उत्तमनगर येथे इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ अत्यंत उत्साहात व भावनिक वातावरणात संपन्न
प्रतिनिधी शिवाजी पाटील पुणे
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शिवव्याख्याते साहित्यरत्न डॉ. गणेश विठ्ठल राऊत यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक श्री. अमोल मिडगुले सर यांनी केले.
सुयोग्य नियोजनात झालेल्या या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी शाळा व शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त करत गौरवोद्गार काढले. आपल्या शालेय जीवनातील गोड आठवणींना उजाळा देताना अनेक विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांच्या डोळ्यांत अश्रू दाटून आले.
यावेळी शाळेचे उपशिक्षक श्री. दिपक तांबे सर यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.
प्रमुख पाहुणे, साहित्यरत्न डॉ. गणेश राऊत यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शंभुराजे आणि भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदर्श मानून जीवन घडवण्याचा मौलिक संदेश दिला. तसेच, आपल्या मातृभूमी व शाळेचे स्मरण सदैव ठेवावे, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.
कार्यक्रमप्रसंगी शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा रागिनी जंगम, उपाध्यक्ष रंजना बनसोडे, शुभांगी शिंदे, सुमन कराडकर, उषा बडगे, पोर्णिमा माने हॆ सदस्य व पालक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. सिद्धेश्वर नागरगोजे यांनी केले, तर श्री. गोविंद लवांडे यांनी सर्वांचे आभार मानले.








