रूईभर येथे जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ‘बीबीएफ’द्वारे सोयाबीन पेरणी प्रात्यक्षिक संपन्न; जिल्हाधिकारी कीर्तीकिरण पुजार यांनी स्वतः चालवला ट्रॅक्टर!
**धाराशिव:** जिल्हा प्रतिनिधी :-लाडलेसाब नदाफ
हवामान खात्याने वर्तवलेल्या एल निनोच्या पार्श्वभूमीवर, शेतकऱ्यांनी पाण्याचा पुरेपूर व योग्य वापर करण्यासाठी बीबीएफ (रुंद वरंबा सरी), टोकण पद्धतीने पेरणी करणे काळाची गरज बनली आहे. याच अनुषंगाने आज मौजे **रूईभर (ता. धाराशिव)** येथे तालुका कृषी अधिकारी कार्यालय धाराशिव यांच्या वतीने **’बीबीएफद्वारे सोयाबीन पीक पेरणी प्रात्यक्षिक’** कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या विशेष कार्यक्रमासाठी जिल्ह्याचे ** जिल्हाधिकारी कीर्तीकिरण पुजार ** जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी **असलकर साहेब** तालुका कृषी अधिकारी श्री राहूल दिवाणे प्रामुख्याने उपस्थित होते.
### **जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः केलं ट्रॅक्टरद्वारे पेरणीचे प्रात्यक्षिक**
कार्यक्रमादरम्यान माननीय जिल्हाधिकारी कीर्तीकिरण पुजार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना, एल निनोच्या धर्तीवर दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी सर्व शेतकरी बांधवांना बीबीएफ तंत्रज्ञानाचा वापर करूनच पेरणी करण्याचे आवाहन केले. केवळ आवाहनच नव्हे, तर जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः ट्रॅक्टरवर बसून बीबीएफ पद्धतीने पेरणी कशी करावी, याचे थेट प्रात्यक्षिक शेतात करून दाखवले. जिल्हाधिकाऱ्यांचा हा उत्साह पाहून उपस्थित शेतकऱ्यांचाही उत्साह द्विगुणित झाला.
### **बीबीएफ तंत्रज्ञानाचे महत्त्व व विविध प्रात्यक्षिके**
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. असलकर साहेब यांनी शेतकऱ्यांना बीबीएफ पद्धतीचे सविस्तर फायदे समजावून सांगितले. यामुळे कमी पावसातही पिकाला ओलावा मिळतो आणि अतिवृष्टी झाल्यास पाण्याचा योग्य निचरा होतो, हे त्यांनी स्पष्ट केले.
तालुका कृषी अधिकारी श्री राहूल दिवाणे यांनी यावेळी खरीप हंगामाचे नियोजन, बीज प्रक्रियेचे महत्त्व, संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापन तसेच अल निनो च्या पार्श्वभूमीवर बदलत्या हवामानात शास्त्र पीक पद्धतीचा अवलंब करण्याचे आवाहन केले.
यावेळी उपस्थित महिला शेतकरी गटांनी ‘बीज प्रक्रिया मोहीम’ राबवत त्याचे थेट प्रात्यक्षिक दाखवले. तसेच शेतातील कीड नियंत्रणासाठी अत्यंत महत्त्वाचे असणारे **पक्षी थांबे, फेरोमोन ट्रॅप्स (कामगंध सापळे) आणि चिकट सापळे** कसे बसवावेत, याचेही प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले.
### **मान्यवरांची उपस्थिती**
या यशस्वी कार्यक्रमासाठी कृषी विभागातील वरिष्ठ अधिकारी व गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते, ज्यात प्रामुख्याने:
* **कृषी विभाग अधिकारी:** तालुका कृषी अधिकारी (धाराशिव) श्री. राहूल दिवाणे साहेब, मंडळ कृषी अधिकारी श्रीमती गादेकर मॅडम, उपकृषी अधिकारी श्री. लेणेकर सर, सहाय्यक कृषी अधिकारी श्री. सोनवणे साहेब.
* **स्थानिक प्रतिनिधी व संस्था:** गावचे सरपंच भगीरथ भैया लोमटे, पाणी फाउंडेशन गटामध्ये सहभागी असलेले ‘जिजाऊ शेतकरी महिला गट’, ‘जिजाऊ शेतकरी पुरुष गट’, एडीएमचे व्यवस्थापक आणि मौजे रूईभर येथील बहुसंख्य ग्रामस्थ व शेतकरी बांधव उपस्थित होते.
कृषी विभागाच्या या महत्त्वपूर्ण उपक्रमामुळे रूईभर व परिसरातील शेतकऱ्यांना आधुनिक आणि शाश्वत शेती पद्धतीची मोलाची माहिती मिळाली व जिल्हाधिकारी महोदय यांनी स्वतः बांधावर उतरून शेतकऱ्यांसोबत साधलेला संवाद यामुळे शेतकऱ्यांनी प्रशासन आपल्या सोबत आहे याबाबत समाधान व्यक्त केले.








