लोकशाहीचा चौथा स्तंभ मानल्या जाणाऱ्या पत्रकाराचा आवाज दाबण्याचा प्रयत्न?
अकोट/ प्रतिनिधी
अकोट: रंभापूर फाटा ते वरखेड तथा वारी फाटा रस्त्याच्या रखडलेल्या कामाविरोधात ७ जूनपासून आमरण उपोषणाचा इशारा देणारे पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते रविराज मोरे यांना तडीपारीची नोटीस बजावण्यात आल्याने राजकीय, सामाजिक आणि पत्रकारिता क्षेत्रात चर्चेला उधाण आले आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभ मानल्या जाणाऱ्या पत्रकाराचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप विविध स्तरांतून केला जात आहे.जनतेच्या मूलभूत प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या पत्रकाराविरोधात तडीपारीची कारवाई प्रस्तावित करण्यात आल्याने अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि लोकशाही मूल्यांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. जनतेच्या समस्या शासन आणि प्रशासनापर्यंत पोहोचविण्याचे काम पत्रकार करीत असतात. अशा परिस्थितीत जनहिताच्या प्रश्नांवर आवाज उठविणाऱ्या पत्रकारालाच लक्ष्य केले जात असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.
रविराज मोरे यांना अकोट उपविभागीय कार्यालयाच्या आदेशानुसार तडीपारीची नोटीस बजावण्यात आली असून अकोला, वाशिम, बुलढाणा, अमरावती आणि यवतमाळ या पाच जिल्ह्यांतून हद्दपार करण्याचा प्रस्ताव असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर पत्रकार संघटना, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध संघटनांनी चिंता व्यक्त केली आहे.दरम्यान, रविराज मोरे यांनी या कारवाईला लोकशाहीविरोधी असल्याचा आरोप करत कोणत्याही दबावाला न जुमानता जनतेच्या प्रश्नांसाठीचा संघर्ष सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. तसेच या प्रकरणी न्यायालयीन लढा देण्याचाही इशारा त्यांनी दिला आहे.








