रत्नागिरी ऑनलाईन बँकिंगद्वारे तब्बल ४ लाख ८२ हजारांची फसवणूक करणाऱ्या दोघांच्या रत्नागिरी पोलिसांनी मुंबईतील दहीसर येथून आरोपीच्या आवळल्या मुसक्या.
प्रतिनिधी मुकुंद मोरे
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जयगड पोलिस स्थानक हद्दीतील साखरी बौद्धवाडी येथील एकाच्या बैंक खात्यातून चोरांनी दि. १७ फेब्रुवारी ते दि. ९ मार्च २०२६ या कालावधीत ही रक्कम काढून घेतली होती. दुर्गेश चम्मण रॉय वय ४८ आणि अर्जुन रामसुंदर चौहान वय ३८ अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहे. याप्रकरणी दि. २१ मार्च रोजी जयगड पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याच्या तपासाची धुरा रत्नागिरी ग्रामीण पोलिस स्थानकाचे प्रभारी पोलिस निरीक्षक राजेंद्र यादव यांच्याकडे सोपवण्यात आली होती.
पोलिस उपनिरीक्षक अभय तेली आणि त्यांच्या पथकाने गोपनीय माहिती, तांत्रिक विश्लेषण आणि सीसीटीव्ही फुटेजचा अभ्यास केला. या गुन्ह्याचे धागेदोरे मुंबईतील दहीसर परिसरात असल्याचे समोर आले. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून दहीसर पूर्व येथून दुर्गेश रॉय आणि अर्जुन चौहान या दोघांना ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी फिर्यादीच्या खात्यातून रक्कम काढल्याची कबुली दिली. त्यानंतर शुक्रवारी, दि. १७ रोजी मध्यरात्री या दोघांना अटक झाली.
ही कारवाई पोलिस उपनिरीक्षक अभय तेली, अंमलदार संदेश मोंडे आणि सायबर पोलिस स्थानकाच्या दुर्वा शेटे यांनी केली. या रॅकेटमध्ये अजून कोणाचे हात गुंतले आहेत का, याचा तपास पोलिस करत आहेत.








