मद्यधुंद चालकांवर ठाणे पोलिसांचा चाबूक; मुंब्रा ट्रॅफिक विभागाची धडाकेबाज कारवाई
ठाणे / मुंब्रा प्रतिनिधी सुरेश रेवणकर
ठाणे शहरातील मुंब्रा ट्रॅफिक उपविभागात मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्यांविरोधात पोलिसांनी कडक भूमिका घेत धडाकेबाज कारवाई केली आहे. दिनांक 16 एप्रिल 2026 रोजी दुपारी 2:18 वाजता मुंब्रा अग्निशमन दलाजवळ नाकाबंदी दरम्यान हेड कॉन्स्टेबल समीना युसुफ सय्यद यांनी संशयित अवस्थेत दुचाकी चालवणाऱ्या मोहम्मद हौस खान (वाहन क्रमांक MH-04-IN-1646) याला अडवले.
तपासणीदरम्यान चालकाने पोलिसांशी उद्धट वर्तन केले. त्यानंतर ब्रेथ अॅनालायझर चाचणीत त्याच्या रक्तात 115.5 mg/100 mL इतके अल्कोहोल आढळले, जे कायदेशीर मर्यादेपेक्षा खूप जास्त आहे. याप्रकरणी मोटार वाहन कायदा कलम 185 अंतर्गत गुन्हा दाखल करून दुचाकी व आरसी बुक जप्त करण्यात आली असून प्रकरण प्रथम वर्ग न्यायालय, ठाणे येथे सादर करण्यात आले आहे.
या कारवाईबाबत सामाजिक कार्यकर्ते इरफान कुरेशी यांनी मुंब्रा ट्रॅफिक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल आहेर यांच्याशी संवाद साधत विविध मुद्द्यांवर माहिती घेतली. अतुल आहेर यांनी स्पष्ट केले की, मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवणे हा गंभीर गुन्हा असून अशा प्रकरणांमध्ये पुढेही कठोर कारवाई सुरू राहणार आहे.
यावेळी मुंब्रा परिसरात अल्पवयीनांकडून वाहन चालवण्याच्या वाढत्या घटनांवरही चर्चा झाली. यावर आहेर यांनी पालकांना आवाहन करत सांगितले की, मुलांना अधिकृत मोटर ट्रेनिंग स्कूलमध्ये प्रशिक्षण देऊन वैध परवाना मिळाल्यानंतरच वाहन चालवू द्यावे, अन्यथा कारवाई केली जाईल.
काही दिवसांपूर्वी एम.एम. व्हॅली परिसरात झालेल्या भीषण अपघाताचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की, हेल्मेटचा वापर आणि ट्रिपल सीट टाळली असती तर दोन निष्पाप जीव वाचले असते. वाहतूक विभागाने संबंधित रस्त्याचा सुमारे दीड किलोमीटरचा सर्वे केला असून रस्त्याची स्थिती समाधानकारक असल्याचे समोर आले आहे. मात्र स्पीड ब्रेकरची संख्या मोठी असल्याचेही निदर्शनास आले.
तसेच मित्तल ग्राउंड ते वाय जंक्शन दरम्यान अवैध पार्किंगच्या समस्येवरही लक्ष देण्यात आले आहे. याबाबत महानगरपालिकेला पत्र देण्यात आले असून लवकरच अधिकृत पार्किंग व्यवस्था सुरू करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.
दरम्यान, ज्या वाहनचालकांवर मोठा दंड बाकी आहे, त्यांनी 30 एप्रिलपर्यंत वाहनाची कागदपत्रे सादर केल्यास 9 मे रोजी होणाऱ्या लोकअदालतीत दंडात सवलत मिळण्याची शक्यता असल्याची माहिती देण्यात आली आहे.
शेवटी, पोलिसांनी नागरिकांना पुन्हा एकदा आवाहन केले की, वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करा. कारण नियमभंग हा केवळ कायदेशीर गुन्हा नसून तो जीवघेणा ठरू शकतो. हेल्मेटचा वापर हा दंड टाळण्यासाठी नव्हे, तर स्वतःच्या सुरक्षेसाठी अत्यावश्यक आहे.








