पाऊस गायब, शेतकरी चिंतेत; आमदार प्रवीण स्वामींची लोहारा तालुक्यातील शेतशिवारात धाव
जिल्हा प्रतिनिधी :-लाडलेसाब नदाफ लोहारा : लोहारा तालुक्यात मागील काही दिवसांपासून पावसाचा खंड पडल्याने खरीप पिकांवर संकट निर्माण झाले आहे. पिकांच्या वाढीसाठी सध्या पावसाची नितांत गरज असताना पावसाने उघडीप दिल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर आमदार प्रवीण स्वामी यांनी जेवळी, विलासपूर-पांढरी, बेडकाळ आणि मार्डी परिसरातील शेतशिवारात प्रत्यक्ष जाऊन पिकांची पाहणी केली.
यावेळी आमदार स्वामी यांनी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून सोयाबीन, तूर, मूग, उडीद यांसह विविध खरीप पिकांची सद्यस्थिती, जमिनीतील ओलावा, उपलब्ध पाण्याची परिस्थिती आणि पावसाच्या खंडामुळे पिकांवर होत असलेला परिणाम याबाबत माहिती घेतली.
पावसाच्या सुरुवातीच्या काळात झालेल्या पावसाच्या आधारावर शेतकऱ्यांनी खरीप पिकांची पेरणी केली. मात्र, पिके वाढीच्या महत्त्वाच्या टप्प्यावर असताना पावसाने दडी मारल्याने जमिनीतील ओलावा कमी होत आहे. आगामी काळात पाऊस न झाल्यास पिकांच्या वाढीवर तसेच उत्पादनावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता शेतकऱ्यांनी आमदारांच्या निदर्शनास आणून दिली.
पिकांच्या नुकसानीचे तातडीने सर्वेक्षण करण्याची मागणी
पावसाचा खंड आणखी वाढल्यास संभाव्य पीक नुकसानीचे तातडीने पंचनामे करून महसूल व कृषी विभागामार्फत वस्तुनिष्ठ अहवाल तयार करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. तसेच शेतकऱ्यांना पीक विमा, नुकसानभरपाई व शासनाच्या इतर योजनांचा लाभ मिळण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली.
शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होऊ नये आणि त्यांना शासनाच्या मदतीपासून वंचित राहावे लागू नये, यासाठी प्रशासनाने परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवावे, अशी भूमिका आमदार प्रवीण स्वामी यांनी मांडली.
पावसाचा खंड वाढल्यास परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता लक्षात घेऊन संबंधित विभागांनी गावनिहाय पिकांची पाहणी करावी, शेतकऱ्यांच्या अडचणींची नोंद घ्यावी आणि आवश्यक त्या उपाययोजना तातडीने कराव्यात, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी शासनाकडे पाठपुरावा
लोहारा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकांची सद्यस्थिती आणि पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची माहिती शासन व प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यात येईल. शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत मिळवून देण्यासाठी आपण सातत्याने पाठपुरावा करू, अशी ग्वाही आमदार प्रवीण स्वामी यांनी यावेळी दिली.
पावसाच्या खंडामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत प्रशासनाने केवळ पंचनाम्यापुरते मर्यादित न राहता शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मदत मिळेल यासाठी तातडीने कार्यवाही करावी, अशी अपेक्षा शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.
यावेळी तालुकाप्रमुख अमोल बिराजदार,माजी सरपंच राजू समाने, सहाय्यक गट विकास अधिकारी जगदेव वगे,आज जेवळी व विलासुर पांढरी येथे v .k. कांबळे सर व राजू चव्हाण यांच्या शेतामध्ये सोयाबीन पिकाचे पाहणी करते वेळी आमदार श्री प्रवीण स्वामी सर त्यासोबत तलाठी रेड्डी, साहेबलाल शेख, शिवानंद तोरकडे, ग्रामपंचायत मेंबर राम मोरे,बाबुराव डोंबे, उपकृषी अधिकारी शाम गंगणे,सहायक कृषी अधिकारी शैलेश जट्टे, नायब तहसीलदार अनिल अहिरे,कृषी सहाय्यक विक्रम निकम,अनिल गोरे,दत्ता पाटील,परमेश्वर गोरे, बळवंत जाधव, ज्ञानेश्वर गोरे, व्ही के कांबळे राजू चव्हाण,तलाठी रेड्डी,साहेबलाल शेख,शिवानंद तोरकडे, ग्रामपंचायत मेंबर राम मोरे,बाबुराव डोंबे,आदी शेतकरी ग्रामस्थ उपस्थित होते.








