आदिवासी दिनाच्या रात्री आश्रमशाळेत काळरात्र!
विषारी सर्पदंशाने तीन विद्यार्थिनींचा दुर्दैवी मृत्यू; तीन मुली गंभीर
जपतलाई आश्रमशाळेतील धक्कादायक घटनेने वसतिगृहांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर; दोषींवर कठोर कारवाईची मागणी
गडचिरोली : एकीकडे संपूर्ण देशात जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा होत असताना, गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यात घडलेल्या हृदयद्रावक घटनेने आदिवासी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. जपतलाई येथील अनुदानित आदिवासी आश्रमशाळेच्या वसतिगृहात मध्यरात्री विषारी सापाने दंश केल्याने तीन विद्यार्थिनींचा दुर्दैवी मृत्यू, तर तीन विद्यार्थिनी गंभीर जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. धानोरा तालुका मुख्यालयापासून सुमारे दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या जपतलाई येथील कुप्पालिंगो शैक्षणिक व सांस्कृतिक विकास संशोधन संस्थेद्वारा संचालित अनुदानित आश्रमशाळेच्या वसतिगृहात ही घटना घडली. मृत विद्यार्थिनींमध्ये सुश्मिता सरोजित मंडल (१४), दीपिका एतवा लकडा (१२) आणि अनु गजुराम कोरेटी (८) यांचा समावेश आहे. तर दीपिका बिटलूरसाय मडावी (११), समृद्धी सुरेश नैताम (१४) आणि कविता राजकुमार किरंगा (१२) या विद्यार्थिनींवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.
प्राथमिक माहितीनुसार, वसतिगृहात विद्यार्थिनींच्या संख्येच्या तुलनेत खाटा उपलब्ध नसल्याने विद्यार्थिनी जमिनीवर गाद्या अंथरून झोपत होत्या, अशी माहिती समोर येत आहे. मध्यरात्री झोपेत असतानाच विषारी सापाने काही विद्यार्थिनींना दंश केला. घटनेची माहिती मिळताच त्यांना तातडीने उपचारासाठी हलविण्यात आले. मात्र, तीन विद्यार्थिनींचा जीव वाचविण्यात यश आले नाही. या घटनेनंतर आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांची निवासव्यवस्था, स्वच्छता, सर्पप्रतिबंधक उपाययोजना, वसतिगृहाची नियमित तपासणी, उपलब्ध खाटा, सुरक्षा व्यवस्था तसेच आपत्कालीन वैद्यकीय यंत्रणा यावर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
गडचिरोली जिल्ह्यातील आश्रमशाळांमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी शासनाकडून कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला जात असताना, विद्यार्थ्यांना सुरक्षित निवासाची आणि मूलभूत सुविधांची हमी मिळत नसेल तर या निधीचा नेमका उपयोग कुठे होतो, असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आदिवासी समाजाचे प्रतिनिधित्व करत असताना आदिवासी विद्यार्थ्यांना अशा असुरक्षित परिस्थितीत शिक्षण घ्यावे लागणे ही अत्यंत गंभीर बाब आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. आश्रमशाळांच्या देखरेखीसाठी शासनाची सक्षम यंत्रणा असताना वसतिगृहांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना झाल्या आहेत की नाहीत, याची नियमित तपासणी केली जाते का? खाटा, स्वच्छता, औषधोपचार, सर्पप्रतिबंधक उपाययोजना आणि आपत्कालीन व्यवस्था यासाठी उपलब्ध निधीचा योग्य वापर झाला का? याची स्वतंत्र व उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी होत आहे.
दोषींवर गुन्हे दाखल करा; मृत विद्यार्थिनींच्या कुटुंबीयांना १ कोटींची मदत द्या
या संपूर्ण घटनेची निष्पक्ष, स्वतंत्र व उच्चस्तरीय चौकशी करून निष्काळजीपणा किंवा कर्तव्यात कसूर आढळल्यास संबंधित अधिकारी, कर्मचारी तसेच जबाबदार पदाधिकाऱ्यांवर कठोर प्रशासकीय व कायदेशीर कारवाई करावी. दोषी आढळणाऱ्या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करून आवश्यकतेनुसार गुन्हे दाखल करावेत. तसेच मृत विद्यार्थिनींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १ कोटी रुपयांची आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी माहिती अधिकार, पत्रकार संरक्षण व पोलीस मित्र समितीचे जिल्हाध्यक्ष श्री. मनोज उराडे यांनी केली आहे.
“आदिवासी दिनाच्या दिवशी आदिवासी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न इतक्या भीषण पद्धतीने समोर येणे ही केवळ दुर्घटना म्हणून दुर्लक्षित करता येणार नाही. आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या जीविताशी तडजोड होत असेल तर त्याची जबाबदारी निश्चित झालीच पाहिजे. या घटनेतील सत्य जनतेसमोर आणून दोषींवर कठोर कारवाई होईपर्यंत हा विषय दडपला जाऊ नये,” – श्री. महेश सारणीकर, राज्य अध्यक्ष, माहितीचा अधिकार, पत्रकार संरक्षण आणि पोलीस मित्र समिती, महाराष्ट्र.








