शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) – ठाणे जिल्हादिनांक: २१ जून २०२६
‘NEET’ परीक्षा केंद्रांना छावणीचे स्वरूप देऊन विद्यार्थ्यांचा छळ कशासाठी? – केदार दिघे यांचा संतप्त सवाल
प्रतिनिधी दौलत सरवणकर
ठाणे/भाईंदर:”देशभरात वैद्यकीय प्रवेशासाठी घेतली जाणारी ‘NEET’ परीक्षा ही विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेची परीक्षा असण्याऐवजी त्यांच्या मानसिक धैर्याची परीक्षा ठरत आहे.
भाईंदर येथील J.H. Poddar High School & Junior College या परीक्षा केंद्राबाहेर जे चित्र पाहायला मिळाले, ते अत्यंत चिंताजनक आहे. परीक्षा केंद्रांना छावणीचे स्वरूप देऊन विद्यार्थ्यांवर आणि पालकांवर प्रचंड मानसिक ताण आणला जात आहे,” असा घणाघाती आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी केला आहे.
भाईंदर येथील केंद्रावर परीक्षेच्या नावाखाली अभूतपूर्व आणि अवाजवी कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती. परीक्षा केंद्राच्या २०० मीटर आधीच पोलिसांनी सुरक्षा फळी उभारली होती. शेकडो पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त, आजूबाजूची बंद केलेली दुकाने आणि खाजगी वाहनांना केलेली प्रवेशबंदी यामुळे संपूर्ण परिसराला लष्करी छावणीचे स्वरूप आले होते. कडक उन्हात ताटकळत उभ्या असलेल्या पालकांच्या मनात कमालीची धाकधूक निर्माण झाली होती.
यावर तीव्र आक्षेप घेत केदार दिघे म्हणाले, “माझा शिक्षण मंत्रालय आणि परीक्षा घेणाऱ्या यंत्रणेला थेट प्रश्न आहे की, हा सुरक्षेचा अवाजवी आव आणण्याचा हेतू काय? जिथे प्रत्यक्षात पेपर फुटतात, जिथे मोठे गैरप्रकार आणि घोटाळे होतात, तिथे जर आधीच अशी कठोर दक्षता आणि गुप्तचर यंत्रणा राबवली असती, तर आज देशभरातील लाखो प्रामाणिक विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला लागले नसते. स्वतःच्या यंत्रणेतील उणिवा आणि अपयश लपवण्यासाठी निष्पाप विद्यार्थ्यांच्या मनावर हा ताण कशासाठी दिला जात आहे?”
“परीक्षा अत्यंत पारदर्शक आणि सुरक्षित वातावरणातच व्हायला हवी, यात दुमत नाही. परंतु, परीक्षेच्या ठिकाणी दहशत निर्माण करून विद्यार्थ्यांना गुन्हेगारांसारखे वागवणे थांबले पाहिजे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष विद्यार्थी आणि पालकांच्या या मानसिक छळाच्या विरोधात असून, आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत,” असा इशाराही दिघे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे.








