‘हरित धाराशिव’ची जय्यत तयारी सामाजिक वनीकरण विभागाकडून ३५ लाखांहून अधिक रोपांची निर्मिती
*जिल्हाधिकारी कीर्तीकुमार पूजार यांच्या संकल्पनेला उत्स्फूर्त प्रतिसाद ; १५ जूनपासून शासकीय दरात रोपे उपलब्ध*
धाराशिव जिल्हा प्रतिनिधी :-लाडलेसाब नादाफ
धाराशिव दि.१४ जून जिल्ह्याला अधिक हिरवेगार, पर्यावरणपूरक आणि शाश्वत विकासाच्या दिशेने नेण्यासाठी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पूजार यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असलेल्या ‘हरित धाराशिव अभियान २०२६’ ची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे.जिल्हाधिकाऱ्यांच्या या महत्त्वाकांक्षी उपक्रमाला जिल्हाभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून,या अभियानाचा मुख्य आधारस्तंभ असलेल्या सामाजिक वनीकरण विभागाने निसर्गाच्या विविध आव्हानांवर मात करत तब्बल ३५ लाखांहून अधिक दर्जेदार रोपांची निर्मिती केली आहे.
मागील वर्षी २०२५ मध्ये राबविण्यात आलेल्या ‘हरित धाराशिव अभियान’ अंतर्गत एकाच दिवशी १७ लाख तर संपूर्ण पावसाळ्यात तब्बल ३२ लाख रोपांची यशस्वी लागवड करण्यात आली होती.या मोहिमेत सामाजिक वनीकरण विभागाने प्रमुख पुरवठादार म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली होती.मात्र,२०२५ च्या पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नोव्हेंबर महिन्यापर्यंत जिल्ह्यात नवीन रोपवाटिका सुरू करण्यासाठी पोषक वातावरण उपलब्ध नव्हते.अशा प्रतिकूल परिस्थितीतही जिल्हाधिकारी श्री.पूजार यांनी २०२६ च्या पावसाळी वृक्षलागवडीसाठी सामाजिक वनीकरण विभागास २५ लाख रोपे निर्मितीचे आव्हानात्मक उद्दिष्ट दिले होत
*१५ जूनपासून ‘वनमहोत्सव : सर्वांसाठी रोपे उपलब्ध*
येत्या १५ जून ते १५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत जिल्ह्यात ‘वनमहोत्सव’ साजरा करण्यात येणार आहे.या कालावधीत सामाजिक वनीकरण विभागाच्या सर्व १९ रोपवाटिकांमधून नागरिक, सामाजिक संस्था तसेच शासकीय कार्यालयांना अत्यंत किफायतशीर शासकीय दरात रोपे उपलब्ध करून दिली जाणार आहेत.नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन सामाजिक वनीकरण, विभाग,धाराशिव यांनी केले आहे.
“जिल्हाधिकारी कीर्ती किरण पूजार यांच्या मार्गदर्शनाखाली धाराशिव जिल्हा हरित करण्यासाठी आमचा विभाग पूर्णपणे सज्ज आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून आमच्या पथकाने ३५ लाखांहून अधिक उच्च दर्जाची रोपे तयार केली आहेत.नागरिकांनी यंदाच्या पावसाळ्यात वनमहोत्सवात मोठ्या संख्येने सहभागी होत वृक्षलागवडीच्या चळवळीत योगदान द्यावे,असे आवाहन सामाजिक वनीकरण विभाग,धाराशिव यांनी केले आहे.” हरित धाराशिव अभियान २०२६” मुळे जिल्ह्यात केवळ वृक्षसंवर्धनालाच चालना मिळणार नसून पर्यावरण संतुलन, जैवविविधता संवर्धन आणि भविष्यातील पिढ्यांसाठी हरित वारसा निर्माण करण्याच्या दिशेनेही एक मोठे पाऊल उचलले जात आहे.








