खून प्रकरणातील मुख्य आरोपी धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात
धाराशिव, दि. १० प्रतिनिधी लाडलेसाब नदाफ
– परंडा तालुक्यातील चिंचपूर खुर्द येथील बहुचर्चित खून प्रकरणातील मुख्य आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कर्नाटक राज्यातील बसवकल्याण येथून शिताफीने ताब्यात घेतले आहे. आरोपी गेल्या काही दिवसांपासून फरार होता. या कारवाईमुळे खून प्रकरणाच्या तपासाला महत्त्वाची गती मिळाली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस ठाणे आंबी येथे गुन्हा क्रमांक ९३/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०३ (१) व ३ (५) नुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी दीपक विक्रम गरड (रा. चिंचपूर खुर्द, ता. परंडा, जि. धाराशिव) हा घटनेनंतर फरार झाला होता.
दरम्यान, सदर आरोपी कर्नाटक राज्यातील बसवकल्याण येथे लपून बसल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला प्राप्त झाली. या माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षक रितू खोखर आणि अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांनी विशेष पथक तयार करून बसवकल्याण येथे रवाना केले.
पथकाने मिळालेल्या माहितीच्या आधारे संबंधित ठिकाणी सापळा रचला. पोलिसांची चाहूल लागताच आरोपीने तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तत्परता आणि शिताफी दाखवत आरोपीचा पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले.
त्यानंतर आरोपीला पुढील कायदेशीर कारवाईसाठी पोलीस ठाणे आंबी येथे हजर करण्यात आले आहे. आरोपीच्या अटकेमुळे या बहुचर्चित खून प्रकरणाच्या तपासात महत्त्वाची प्रगती झाल्याचे मानले जात आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक रितू खोखर व अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन खटके, पोलीस हवालदार विनोद जानराव, नितीन जाधवर, बबन जाधवर तसेच पोलीस अंमलदार रोहित दंडनाईक यांचा समावेश होता.
स्थानिक गुन्हे शाखेच्या या कारवाईचे जिल्ह्यातून कौतुक होत असून फरार आरोपींविरुद्ध सुरू असलेल्या शोध मोहिमेला यश मिळाल्याचे मानले जात आहे.








