मुक्ताईनगरमध्ये १८ ऑगस्टच्या संत मुक्ताई पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर स्वच्छता व मूलभूत सुविधांची मागणी
उप संपादक | प्रणित काठोके
मुक्ताईनगर येत्या १८ ऑगस्ट रोजी मुक्ताईनगर शहरात आदिशक्ती संत मुक्ताई पालखी आगमन सोहळा उत्साहात पार पडणार असून, या सोहळ्यासाठी राज्यभरातून मोठ्या संख्येने वारकरी, दिंड्या व भाविक मुक्ताईनगरमध्ये दाखल होणार आहेत. या पार्श्वभूमीवर समस्त वारकरी व मुक्ताईनगर नागरिकांच्या वतीने नगरपंचायतीकडे स्वच्छता, वारकऱ्यांसाठी सुविधा तसेच मांस-मटण विक्री बंद ठेवण्याची मागणी करण्यात आली आहे.
याबाबत नगरपंचायत मुक्ताईनगरच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात नवीन मुक्ताई मंदिर ते कोथळी येथील जुने मुक्ताई मंदिर या संपूर्ण पालखी मार्गाची पाहणी करून तातडीने स्वच्छता करण्याची मागणी करण्यात आली आहे.
पालखी मार्गावर अनेक ठिकाणी कचरा व घाण साचलेली असून, शहराच्या प्रवेशद्वाराजवळील आदिशक्ती संत मुक्ताई उड्डाणपुलाच्या परिसरातही मोठ्या प्रमाणात अस्वच्छता असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
तसेच शहरात सुरू असलेल्या डिव्हायडरच्या कामाजवळ रेती, खडी व इतर बांधकाम साहित्य रस्त्यावर पसरलेले असल्याने पायी चालणाऱ्या वारकऱ्यांना दुखापत होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे हे साहित्य तातडीने बाजूला करून पालखी मार्ग सुरक्षित करण्याची मागणी करण्यात आली आहे.
वारकऱ्यांसाठी तात्पुरत्या शौचालयांची मागणी
पालखी सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने भाविक शहरात येणार असल्याने दिंडी मार्गावर तसेच शहरातील ठिकठिकाणी मोफत तात्पुरत्या प्रसाधनगृहांची योग्य व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
१८ ऑगस्ट रोजी मांस-मटण विक्री बंद ठेवण्याची मागणी
पालखी सोहळ्याचे धार्मिक पावित्र्य जपण्यासाठी १८ ऑगस्ट रोजी मुक्ताईनगर शहरातील सर्व मांस, मटण व मच्छीची दुकाने तसेच कत्तलखाने बंद ठेवण्याबाबत कडक आदेश जारी करावेत, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
नवीन मुक्ताई मंदिर ते कोथळी येथील जुने मुक्ताई मंदिर या संपूर्ण दिंडी मार्गाची विशेष स्वच्छता मोहीम राबवावी, बांधकाम साहित्य हटवावे, वारकऱ्यांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात आणि पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
हे निवेदन लक्ष्मण रमेश सापधरे यांनी समस्त वारकरी व मुक्ताईनगर नागरिकांच्या वतीने नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांना दिले आहे.








