पोलीस अधीक्षक कार्यालय, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण,प्रेस नोट दि. ०६ /६/२६
प्रतिनिधी रणजीत मस्के
“मुलांनो, मोठी स्वप्ने बघा; ती पूर्ण करण्यासाठी पोलीस प्रशासन तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे!” — मा. पोलीस अधीक्षक
जनतेच्या सुरक्षेसाठी, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी दिवस-रात्र कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस अधिकारी व अंमलदारांच्या कुटुंबियांसाठी आजचा दिवस अभिमानाचा, आनंदाचा आणि प्रेरणादायी ठरला. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मधील इयत्ता दहावीच्या परीक्षेत ९० टक्क्यांहून अधिक गुण प्राप्त करून उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या पोलीस पाल्यांचा विशेष गौरव सोहळा आज दिनांक ०६ जून २०२६ रोजी पोलीस मुख्यालय, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
हा गौरव सोहळा मा. श्री. प्रकाश जाधव (पोलीस अधीक्षक, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण) यांच्या अध्यक्षतेखाली तसेच मा. श्री. प्रशांत स्वामी (अपर पोलीस अधीक्षक) यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, विविध शाखांचे प्रभारी अधिकारी, पोलीस अधिकारी, अंमलदार आणि त्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गौरवापलीकडे जाऊन पाल्यांशी साधला थेट संवाद….
मा. पोलीस अधीक्षक श्री. प्रकाश जाधव यांनी प्रत्येक गुणवंत विद्यार्थ्याशी वैयक्तिक संवाद साधत त्यांच्या भविष्यातील ध्येयांविषयी जाणून घेतले. “पुढे कोणत्या क्षेत्रात करिअर करायचे आहे?”, “तुमची स्वप्ने काय आहेत?” असे प्रश्न विचारून त्यांनी विद्यार्थ्यांना प्रेरित केले.
यावेळी डॉक्टर, अभियंता तसेच सनदी अधिकारी होण्याची इच्छा व्यक्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांनी सांगितले की, “यश हे नशिबाने मिळत नाही; ते सातत्यपूर्ण परिश्रम, शिस्त, चिकाटी आणि योग्य दिशेने केलेल्या प्रयत्नांचे फलित असते. तुमचे आई-वडील पोलीस दलात कर्तव्य बजावत असताना अनेकदा कुटुंबापासून दूर राहिले असतील; परंतु त्यांच्या त्यागाचे आणि प्रामाणिक सेवाभावाचे हेच खरे यश आहे. तुम्ही मोठी स्वप्ने बघा आणि ती पूर्ण करण्यासाठी जिद्दीने प्रयत्न करा. तुमच्या उच्च शिक्षणासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस प्रशासन सर्वतोपरी मदत करण्यास कटिबद्ध आहे.”
अपर पोलीस अधीक्षक मा. श्री. प्रशांत स्वामी यांनीही विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे अभिनंदन करत या यशातून इतर पोलीस पाल्यांनाही प्रेरणा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.
सत्काराला उत्तर देताना एका गुणवंत विद्यार्थ्याने अत्यंत भावनिक शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या. तो म्हणाला, “अनेकदा सण-उत्सवांच्या काळात बाबा बंदोबस्तासाठी कर्तव्यावर असायचे. त्यावेळी त्यांची उणीव जाणवायची; परंतु आज त्यांच्या त्यागाचे महत्त्व अधिक चांगल्या प्रकारे समजले. पोलीस अधीक्षकांनी स्वतः जवळ बोलावून माझे स्वप्न विचारले आणि पाठीवर शाबासकीची थाप दिली, हा क्षण माझ्यासाठी अविस्मरणीय आहे. हा सत्कार केवळ सन्मान नसून भविष्यात आणखी मोठे यश संपादन करण्याची प्रेरणा देणारा आहे.”
गुणवंत पोलीस पाल्यांचा विशेष सन्मान…
इयत्ता दहावीच्या परीक्षेत ९० टक्क्यांहून अधिक गुण प्राप्त करणाऱ्या खालील गुणवंत विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा स्मृतिचिन्ह देऊन विशेष गौरव करण्यात आला.
१. कु. अनुष्का दत्तात्रय सुयवंशी – ९५.४०% (CBSE)
२. कु. सारिका योगेश तरमाळे – ९४.८०%
३. चि. ओमकार दत्तात्रय सुयवंशी – ९४.७६% (CBSE)
४. चि. हर्षल सुनिल पवार – ९४.००%
५. चि. देवेन विनोद पदमणे – ९३.२०%
६. चि. सिद्धांत सुनिल ठोंबरे – ९३.००%
७. कु. आकांक्षा महेश घुगे – ९२.०६%
८. कु. तनुजा शिवाजी मुदेवाड – ९१.६०%
९. चि. रुषी भानुदास चव्हाण – ९१.६०%
पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पाल्यांच्या शैक्षणिक यशाचा गौरव करून त्यांच्या मनोबलात वाढ करण्याबरोबरच इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेला हा उपक्रम संपूर्ण पोलीस कुटुंबासाठी प्रेरणादायी ठरला. कार्यक्रमाच्या शेवटी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. ईश्वर जगदाळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.








