उरण एज्युकेशन सोसायटीच्या शाळेत अँटी नार्कोटिक्स टास्क फोर्स (ANTF) तर्फे अमली पदार्थांविरोधात जनजागृती कार्यक्रम उत्साहात पार पडला. वाढत्या अमली पदार्थांच्या गैरवापराच्या पार्श्वभूमीवर “नशा मुक्त भारत अभियान” अंतर्गत नवी मुंबईमध्ये कार्यरत असलेले कार्यकर्ते दर्शन नाईक यांनी उरण परिसरातील परिस्थितीची गांभीर्याने दखल घेत ही जनजागृती मोहीम आयोजित करण्यासाठी पुढाकार घेतला.
प्रतिनिधी रणजीत मस्के
या संदर्भात त्यांनी अँटी नार्कोटिक्स टास्क फोर्सचे DYSP रामचंद्र मोहिते यांच्याशी संपर्क साधून उरण येथे जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्याची विनंती केली. त्यांच्या सकारात्मक प्रतिसादानंतर ANTF कडून एक विशेष पथक पाठविण्यात आले.
या पथकात PSI सुहास तावडे, हेड कॉन्स्टेबल श्याम जगताप, जितेंद्र कांबळे व बाळू मगार यांचा समावेश होता. त्यांनी उरण एज्युकेशन सोसायटीच्या ज्युनिअर कॉलेजमधील विद्यार्थ्यांना अमली पदार्थांचे दुष्परिणाम, त्याचे कायदेशीर परिणाम तसेच आरोग्यावर होणारे गंभीर परिणाम याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
यावेळी दर्शन नाईक यांनी व्यसनाला एक आजार म्हणून संबोधत त्याबाबत सखोल माहिती दिली. तसेच व्यसनमुक्तीसाठी उपलब्ध असलेल्या मदतीविषयी, पुनर्वसन प्रक्रियेविषयी आणि योग्य मार्गदर्शन घेतल्यास व्यसनातून बाहेर पडणे शक्य असल्याचे विद्यार्थ्यांना पटवून दिले.
या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये अमली पदार्थांविषयी जागरूकता निर्माण झाली असून अशा उपक्रमांची आवश्यकता अधोरेखित झाली आहे. उरण परिसरात भविष्यातही अशा प्रकारचे जनजागृती कार्यक्रम राबविण्याचा मानस व्यक्त करण्यात आला.








