सारोळा जलशुद्धीकरण केंद्र परिसरात कुजलेल्या बैलाचा मृतदेह; दूषित पाण्याचा धोका, ग्रामस्थांमध्ये संताप
उपसंपादक | प्रणित काठोके
मुक्ताईनगर तालुक्यातील सारोळा येथील जलशुद्धीकरण केंद्र परिसरात गेल्या सात ते आठ दिवसांपासून एका बैलाचा मृतदेह पडून असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. सदरील मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्याने परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली असून दूषित पाण्याचा धोका निर्माण झाल्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या जलशुद्धीकरण केंद्रातून परिसरातील नागरिकांना पाणीपुरवठा केला जातो. अशा परिस्थितीत जलशुद्धीकरण केंद्राच्या परिसरात मृत जनावराचा कुजलेला मृतदेह अनेक दिवस पडून राहणे ही अत्यंत गंभीर बाब असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या प्रकारामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
दरम्यान, प्रशासनाने या गंभीर प्रकाराकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. नागरिकांच्या जीविताशी संबंधित इतका गंभीर प्रकार घडत असताना प्रशासनाची उदासीनता संतापजनक असल्याची प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
लाखो रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या जलशुद्धीकरण यंत्रणेच्या परिसरात एवढा निष्काळजीपणा कसा झाला, असा सवालही उपस्थित केला जात आहे. जलशुद्धीकरण केंद्रावर संबंधित अधिकारी व कर्मचारी असतानाही अशी परिस्थिती निर्माण होत असेल, तर त्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
या प्रकरणाची तातडीने चौकशी करून संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, मृत जनावराची त्वरित विल्हेवाट लावावी तसेच नागरिकांना शुद्ध व सुरक्षित पाणीपुरवठा होत असल्याची खात्री प्रशासनाने द्यावी, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. स्वच्छ व सुरक्षित पाणी पुरविण्याची जबाबदारी प्रशासनाची असताना अशा प्रकारचा निष्काळजीपणा अत्यंत गंभीर असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.








