मुक्ताईनगर ट्राफिक कारवायांवर गंभीर प्रश्न; नागरिक व पत्रकारांशी उडवाउडवीची उत्तरे
प्रतिनिधी | प्रणित काठोके
मुक्ताईनगर पोलीस स्टेशन अंतर्गत सुरू असलेल्या ट्राफिक कारवायांबाबत नागरिकांकडून गंभीर आरोप केले जात असून, या कारवायांमध्ये आर्थिक व्यवहार होत असल्याच्या चर्चा आता अधिक तीव्र होत आहेत. वाहतूक नियमभंगाविरोधात कारवाईच्या नावाखाली काही वाहनचालकांकडून पैशांची मागणी केली जात असल्याचे आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहेत.
याबाबत काही नागरिक तसेच पत्रकारांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता त्यांना समाधानकारक माहिती देण्याऐवजी उडवाउडवीची उत्तरे देण्यात आल्याचे समोर आले आहे. तसेच काही अधिकाऱ्यांची बोलण्याची पद्धतही योग्य नसल्याची नाराजी व्यक्त केली जात आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
स्थानिकांच्या मते, ट्राफिक कारवाई ही नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी असणे अपेक्षित असताना काही ठिकाणी ती आर्थिक वसुलीचे माध्यम बनत असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
विशेष म्हणजे, जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था मजबूत करण्यासाठी कठोर मोहिमा सुरू असताना मुक्ताईनगरमधील या कथित प्रकारांमुळे पोलीस प्रशासनाच्या प्रतिमेला धक्का बसत असल्याची चर्चा सुरू आहे. नागरिकांनी आता या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
मुक्ताईनगरमधील ट्राफिक कारवाया पारदर्शक आहेत का, की त्यामागे आर्थिक हितसंबंध दडले आहेत? याचे उत्तर आता प्रशासनाने जनतेसमोर स्पष्ट करण्याची गरज निर्माण झाली आहे.








