स्नेहबंध’मुळे समाज कार्य करणाऱ्यांना बळ मिळेल आ. संग्राम जगताप
प्रतिनिधी- सारंग महाजन.
महाराष्ट्र गौरव पुरस्कार २०२५ चे वितरण
अहिल्यानगर – स्नेहबंध सोशल फौंडेशनच्या वतीने देण्यात येणारे पुरस्कार समाजातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्यांना बळ मिळेल. यामुळे समाजकार्य करण्यासाठी नागरिक उत्स्फूर्ततेने पुढे येतील, असा विश्वास आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केला. स्नेहबंध सोशल फौंडेशनच्या वतीने हॉटेल रेडीयन्स येथे महाराष्ट्र गौरव पुरस्कार २०२५ च्या वितरण प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी उपवन संरक्षक धर्मवीर सालविठ्ठल हे होते. व्यासपीठावर पोलिस उपअधीक्षक अमोल भारती, शिल्पकार प्रमोद कांबळे, मारुतीराव मिसळवालेचे संचालक अमित खामकर, स्नेहबंधचे संस्थापक डॉ. उद्धव शिंदे उपस्थित होते.
राज्यातील, जिल्ह्यातील विविध क्षेत्रात समाजहिताचे उल्लेखनीय काम करत असलेल्यांच्या कार्याचा गौरव व्हावा व त्यांना कार्य करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे, यासाठी स्नेहबंधच्या वतीने कला, क्रीडा, शिक्षण, पत्रकारिता, सामाजिक, सांस्कृतिक या क्षेत्रातील मान्यवरांना महाराष्ट्र गौरव पुरस्कार देऊन सन्मानित केले.
आ. जगताप म्हणाले, स्नेहबंधचे संस्थापक डॉ. उद्धवराव शिंदे मामा हे वृक्षारोपण, विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप, कामगारांचे उन्हापासून संरक्षण व्हावे यासाठी टोपी, छत्री, ब्लँकेट वाटप, आरोग्य तपासणी शिबिर असे विविध उपक्रम राबवत आहेत. त्यांची समाजासाठी काम करण्याची धडपड ही कौतुकास्पद आहे.
उपवन संरक्षक सालविठ्ठल म्हणाले, डॉ. उद्धव शिंदे हे स्नेहबंधच्या माध्यमातून निस्वार्थपणे सामाजिक काम करत आहेत. आमच्या कार्यालयात त्यांचे दोन कार्यक्रम झाले. त्यांच्या कार्यास शुभेच्छा.
शिल्पकार प्रमोद कांबळे म्हणाले, आजच्या काळात कला साक्षर होणे खूप गरजेचे आहे. कारण कुठे काय हवे हे कलेची जाण असणारा बरोबर सांगू शकतो.
या कार्यक्रमात ३० जणांना स्मृतिचिन्ह, प्रमाणापत्र देऊन गौरविण्यात आले. सुत्रसंचलन प्रतिक्षा सोनवणे यांनी, तर आभार मुख्याध्यापक संजय शिंदे यांनी मानले.
