शिक्रापूर पोलिसांची धडक कारवाई : धोकादायक इसम गणेश फडतरे याच्यावर स्थानबद्धतेची कारवाई
प्रतिनिधी अशोक पाचुंदकर
शिक्रापूर : शिरूर तालुक्यातील सार्वजनिक सुव्यवस्थेला बाधा निर्माण करणाऱ्या व गंभीर स्वरूपाचे गुन्हे करणाऱ्या इसमांविरुद्ध पुणे ग्रामीण पोलिसांनी कठोर कारवाई केली आहे. त्याअंतर्गत शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीतील धोकादायक इसम गणेश भाऊसाहेब फडतरे (वय ३४ वर्षे, रा. फडतरे वस्ती, कोरेगाव भीमा, ता. शिरूर, जि. पुणे) याच्यावर महाराष्ट्र झोपडपट्टी गुंड, हातभट्टीवाले, औषधीद्रव्य विषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती व इतर समाजविघातक कृत्यांना प्रतिबंध करण्याबाबतच्या कायद्यान्वये स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे.
पुणे ग्रामीण जिल्ह्यात मागील पाच वर्षांच्या कालावधीत संघटित गुन्हेगारी करणारे, जामिनावर सुटून पुन्हा गंभीर गुन्हे करणारे तसेच समाजात दहशत निर्माण करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक मा. श्री. संदीपसिंह गिल यांनी दिले होते.
गणेश फडतरे याच्याविरुद्ध बेकायदेशीर जमाव जमवणे, कट रचणे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे, जाळपोळ करणे, लोकसेवकावर हल्ला करणे, दुखापत करणे, खुनाचा प्रयत्न, अवैध अग्निशस्त्र बाळगणे, खंडणीसाठी धमकी देणे अशा गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.
या पार्श्वभूमीवर शिक्रापूर पोलीस स्टेशनचे तत्कालीन पोलीस निरीक्षक श्री. दिपरतन गायकवाड यांनी प्रस्ताव तयार करून तो पोलीस अधीक्षक श्री. संदीपसिंह गिल यांच्याकडे सादर केला. त्यानंतर प्रस्ताव जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी पुणे श्री. जितेंद्र डुडी यांच्याकडे पाठवण्यात आला.
जिल्हाधिकारी श्री. जितेंद्र डुडी यांनी गणेश फडतरे यास स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले. त्यानुसार दिनांक २०/०६/२०२६ रोजी त्यास ताब्यात घेऊन मध्यवर्ती कारागृह नागपूर येथे दाखल करण्यात आले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. संदीपसिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक श्री. शुभम कुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी शिरूर श्री. प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. प्रमोद क्षीरसागर, शिक्रापूर पोलीस स्टेशनचे तत्कालीन पोलीस निरीक्षक श्री. दिपरतन गायकवाड, नवनियुक्त पोलीस निरीक्षक श्री. चंद्रशेखर यादव, पोलीस उपनिरीक्षक, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक व कर्मचाऱ्यांनी कारवाईत सहभाग घेतला.
पुणे ग्रामीण पोलिसांकडून समाजात दहशत निर्माण करणाऱ्या व कायदा सुव्यवस्था बिघडविणाऱ्या व्यक्तींविरुद्ध यापुढेही कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे.








