दोन कलेक्टर घडविणारी शेतकरी माता काळाच्या पडद्याआड
आईच्या संस्कारांनी घडले IAS तुकाराम मुंढे व वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी अशोक मुंढे
अजिंक्य महाराष्ट्र न्यूज प्रणित काठोके
कपाळावर ठसठशीत कुंकू, अंगावर ग्रामीण वेशभूषेतील लुगडं आणि कष्टाने रापलेलं शरीर… पाहता क्षणी गावातील एक सामान्य शेतकरी महिला वाटणाऱ्या आसराबाई मुंढे या प्रत्यक्षात असामान्य कर्तृत्वाच्या माता होत्या. आपल्या तीन मुलांपैकी दोन मुलांना प्रशासनातील सर्वोच्च पदांपर्यंत पोहोचविणाऱ्या या प्रेरणादायी मातेचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले.
बीड जिल्ह्यातील ताडसोना (ताडसोनना) या छोट्याशा गावातील आसराबाई मुंढे यांचा जन्म अत्यंत साध्या आणि कष्टकरी कुटुंबात झाला होता. ऊसतोड कामगाराची पार्श्वभूमी आणि प्रतिकूल परिस्थिती असूनही त्यांनी शिक्षणाचे महत्त्व कधीही कमी होऊ दिले नाही. शेती करत आणि अनेक संकटांना सामोरे जात त्यांनी आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी अथक परिश्रम घेतले.
“शिक्षण आणि प्रामाणिकपणा माणसाला मोठं बनवतात,” हा त्यांचा जीवनमंत्र होता. याच विचारांवर त्यांनी आपल्या मुलांवर संस्कार केले. त्याचा परिणाम म्हणून त्यांचे सुपुत्र तुकाराम मुंढे (IAS) आणि अशोक मुंढे यांनी प्रशासनातील उच्च पदे गाठत समाजसेवेचा मार्ग निवडला. तर तिसरे सुपुत्र प्राध्यापक म्हणून शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहेत.
IAS अधिकारी तुकाराम मुंढे हे महाराष्ट्रातील अत्यंत प्रामाणिक, धाडसी आणि कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळखले जातात. त्यांनी विविध ठिकाणी काम करताना शिस्त, पारदर्शकता आणि भ्रष्टाचाराविरोधात कठोर भूमिका घेतली. त्यांच्या कार्यामुळे प्रशासनाविषयी सर्वसामान्य नागरिकांमध्ये विश्वास निर्माण झाला.
त्यांचे बंधू अशोक मुंढे यांनीही आपल्या कार्यातून आईच्या संस्कारांचा वारसा जपत प्रशासनात उल्लेखनीय योगदान दिले आहे.
या यशामागे कोणताही राजकीय वारसा, मोठी संपत्ती किंवा विशेष सुविधा नव्हत्या. होते ते केवळ एका कष्टकरी आईचे संस्कार, तिची जिद्द, त्याग आणि शिक्षणावरील अढळ विश्वास. आसराबाई मुंढे यांचे जीवन हे ग्रामीण मातृत्व, संघर्ष आणि शिक्षणाच्या सामर्थ्याचे प्रेरणादायी उदाहरण म्हणून कायम स्मरणात राहील.








