उष्माघाताने होणाऱ्या मृत्यूंना ‘नैसर्गिक आपत्ती’ जाहीर करून वारसास मदत द्यावी; आमदार एकनाथराव खडसे यांची विधानपरिषदेत मागणी*
प्रतिनिधी | प्रणित काठोके
राज्याच्या अनेक भागांत उन्हाचा पारा 45 ते 48 अंश सेल्सिअसपर्यंत जात असून, उष्माघातामुळे दरवर्षी अनेक निष्पाप नागरिकांचा मृत्यू होत आहे. ही बाब अत्यंत गंभीर असून, उष्माघातामुळे होणाऱ्या मृत्यूंचा समावेश ‘नैसर्गिक आपत्ती’ मध्ये करून बाधितांच्या कुटुंबांना तातडीने शासकीय मदत द्यावी, अशी आग्रही मागणी अर्थसंकल्पीय अधिवेशना दरम्यान आ.एकनाथराव खडसे यांनी विधान परिषद सभागृहात केली.
सभागृहात चर्चेत सहभागी होताना खडसे यांनी उत्तर महाराष्ट्रातील, विशेषतः जळगाव, धुळे आणि नंदुरबार तसेच बुलडाणा, अकोला या जिल्ह्यांमधील वाढत्या तापमानाकडे सरकारचे लक्ष वेधले. ते म्हणाले की, या भागात उन्हाळ्यातील सरासरी तापमान 45 अंशांच्या वर असते, तर काही ठिकाणी ते 48 अंशांपर्यंत पोहोचते. अशा कडाक्याच्या उन्हामुळे दरवर्षी मोठ्या संख्येने लोक उष्माघाताचे बळी ठरतात.
नैसर्गिक आपत्तीच्या निकषांवर बोट ठेवत आ. एकनाथराव खडसे यांनी काही महत्वाचे प्रश्न उपस्थित करताना ते म्हणाले जर पूर, आग किंवा इतर नैसर्गिक संकटात मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीच्या वारसांना सरकार 5 लाख रुपयांची मदत देऊ शकते, तर उष्माघातासारख्या नैसर्गिक संकटामुळे जीव गमावलेल्यांना मदत का नाही?
उष्माघात ही मानवनिर्मित समस्या नसून ती निसर्गाच्या वाढत्या प्रकोपामुळे ओढवलेली परिस्थिती आहे. त्यामुळे अशा मृत्यूंना नैसर्गिक आपत्ती मानणे काळाची गरज आहे.
उष्माघाताने दगावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती खालावते, अशा वेळी सरकारने कोणत्याही तांत्रिक अडचणी न दाखवता तातडीने सानुग्रह अनुदान किंवा मदत जाहीर करावी अशी मागणी आ. एकनाथराव खडसे यांनी केली.
खडसे यांनी नमूद केले की, अनेकदा तांत्रिक कारणांमुळे उष्माघाताने झालेल्या मृत्यूंची अधिकृत नोंद होण्यात अडचणी येतात. त्यामुळे बाधितांच्या कुटुंबाला शासकीय मदतीपासून वंचित राहावे लागते. या प्रक्रियेत सुसूत्रता आणून उष्माघाताचा समावेश नैसर्गिक आपत्तीच्या यादीत केल्यास हजारो कुटुंबांना दिलासा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.








