अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
वसमत तालुक्यात ढगफुटी
गुंडा गावातील दोन महिला ओढ्याच्या पाण्यात गेल्या वाहून.
प्रतिनिधी: गोपाळ भालेराव
आरळ:शुक्रवारी ता. १२ सकाळपासून संपुर्ण हिंगोली जिल्ह्यात पाऊसाने थैमान घातले असून अनेक ठिकाणी शेतातील पिकात पाणी घुसल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. तर वसमत तालुक्यातील गुंडा शिवारात ओढ्याला आलेल्या पुराच्या पाण्यात दोन महिला वाहून गेल्याची घटना घडली आहे. प्रशासन व गावकऱ्यांच्या मदतीने त्यांचा शोध सुरु करण्यात आला आहे.
परभणी व हिंगोली जिल्हयात शुक्रवारी सकाळपासून ढगाळ वातावरण होते. त्यानंतर दुपारपासून वादळीवाऱ्यासह मोठ्या पावसाला सुरवात झाली.
वसमतसह हिंगोली जिल्ह्यात जोरदार पाऊस झाल्यामुळे शेतीपिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. तसेच नदी, नाल्यांना पुर आले असून वसमत तालुक्यात अनेक ठिकाणी त्याचा फटका बसला आहे. गुंडा. कळंबा. करंजी. विरेगाव. दारेफळ. अडगाव (रंजे). तुळजापूरवाडी.चिखली. आरळ. झिरो फाटा. हट्टा. तेलगाव. बळेगाव. कोनाथा. रिथुरा. भोगावं. कौडगाव. त या शिवारात पाणी नाल्याच्या पुलावरून वाहात असल्यामुळे सर्व गाव रस्ते बंद झाले आहेत या शिवाय रिधोरा भागातही ढगफुटी सदृष्य पाऊस झाला आहे. या पावसामुळे शेतांमधून पाणीच पाणी झाले असून नदी, नाल्या काठच्या पुराच्या पाण्यामुळे आखाड्यावरील शेती साहित्य वाहून गेल्याने मोठे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर वसमत तालुक्यातील गुंडा शिवारात गयाबाई आंबादास सारोळे (६०) व सखुबाई विश्वानाथ भालेराव (५५) ह्या इतर महिलांसोबत शेतात कामासाठी गेल्या होत्या. सायंकाळच्या सुमारास मोठा पाऊस येत असल्यामुळे त्यांच्यासह इतर महिला शेतातून घराकडे निघाल्या होत्या. यावेळी गुंडा शिवारातील ओढ्यावर पुराचे पाणी आले. या पाण्यातून त्या घराकडे येत असतांना गयाबाई व सखुबाई ह्या दोघींना पाण्याचा अंदाज आलाच नाही. काही वेळातच त्या पुराच्या पाण्यात वाहून गेल्या.
दरम्यान, या दोघी पुराच्या पाण्यात वाहून जात असतांना काही महिलांच्या लक्षात आले.
या घटनेची माहिती मिळाताच जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी तातडीने पथकाला घटनास्थळी रवाना केले. उपविभागीय अधिकारी विकास माने, तहसीलदार शारदा दळवी यांच्यासह महसूल विभागाचे पथक घटनास्थळी ठाण मांडून आहेत. या शिवाय औंढा पोलिस ठाण्याचे पथकही घटनास्थळी दाखल झाले आहे. या दोघींचा शोध सुरु करण्यात आला असून रात्रीमुळे शोध कार्यात अडचणी येत आहेत. शनिवारी ता. १३ पहाटेपासून त्यांचा पुन्हा शोध सुरु केला जाणार असल्याचे महसूलच्या सुत्रांनी सांगितले.
गुंडा शिवारातून वाहणारा ओढा गुंडा शिवारातून निघून पुढे कळंबा दारेफळ. आरळ, तेलगाव नदीकडे जातो. त्यामुळे त्या भागातही शोध घेतला जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
