कॅरीबॅगशी नाते तोडा, पर्यावरणाशी नाते जोडा” : स्नेहबंधचे प्लास्टिकमुक्ती अभियान.
प्रतिनिधी -सारंग महाजन.
मान्यवरांच्या हस्ते अभियानाच्या पोस्टरचे अनावरण; नागरिकांना प्लास्टिकमुक्तीचा संदेश
अहिल्यानगर : “स्वच्छ, सुंदर आणि पर्यावरणपूरक अहिल्यानगर घडविण्यासाठी प्रत्येकाने प्लास्टिकमुक्त जीवनशैलीचा स्वीकार करावा,” असे आवाहन डॉ. उद्धव शिंदे यांनी केले. प्लास्टिकमुक्ती अभियानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
पर्यावरण संवर्धन आणि प्लास्टिकमुक्त समाज निर्मितीच्या उद्देशाने स्नेहबंध सोशल फौंडेशनच्या वतीने ‘कॅरीबॅगशी नाते तोडा, पर्यावरणाशी नाते जोडा’ या संदेशाखाली प्लास्टिकमुक्ती जनजागृती अभियान राबविण्यात येणार आहे.
या अभियानाच्या पोस्टरचे अनावरण पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, आमदार संग्राम जगताप, महानगरपालिकेच्या महापौर सौ. ज्योतीताई गाडे, उद्योजक अमोल गाडे, तसेच छावणी परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पल्लवी विजयवंशी यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी स्नेहबंध सोशल फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे यांनी प्लास्टिकमुक्तीचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले, प्लास्टिकचा वाढता वापर पर्यावरण, मानव आणि प्राणीजीवनासाठी धोकादायक ठरत आहे. प्लास्टिकमुळे माती, पाणी व हवेचे प्रदूषण वाढत असून पर्यावरणाचा समतोल बिघडत आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळून कापडी किंवा पर्यावरणपूरक पर्यायांचा स्वीकार करणे आवश्यक आहे.
या अभियानाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये जनजागृती करून प्लास्टिकच्या वापराबाबत जागरूकता निर्माण केली जाणार आहे. शाळा, महाविद्यालये, व्यापारी संघटना व विविध सामाजिक संस्थांच्या सहकार्याने प्लास्टिकमुक्तीचा संदेश समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.









