गडचिरोलीत लोहखनिज सर्वेक्षणावरून पेटला संघर्ष; वेलमागड ग्रामसभेचा इशारा—‘स्थगिती नाही तर तीव्र आंदोलन
जिल्हा प्रतिनिधी :श्री मनोज उराडे
गडचिरोली : एटापल्ली तालुक्यातील जवेली खुर्द ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या सुमारे ६४० हेक्टर क्षेत्रावर प्रस्तावित लोहखनिज सर्वेक्षणाविरोधात वेलमागड ग्रामसभेने तीव्र आक्रमक भूमिका घेतली आहे. या पार्श्वभूमीवर आमदार धर्मरावबाबा आत्राम यांना सविस्तर निवेदन सादर करण्यात आले असून, प्रशासनाने तातडीने ही प्रक्रिया स्थगित न केल्यास लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा स्पष्ट इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
ओमसाईराम स्टील अँड नॅचरल रिसोर्सेस एनर्जी प्रा. लि. या कंपनीकडून या भागात खनिज उत्खननासाठी सर्वेक्षणाची तयारी सुरू असून, २५ मार्च रोजी कंपनीच्या प्रतिनिधींनी गावात येऊन वनसमितीचा ठराव मंजूर करून घेण्यासाठी दबाव टाकल्याचा गंभीर आरोप ग्रामसभेने केला आहे. ठराव न दिल्यास पोलिस बळाचा वापर करून काम सुरू करण्याची धमकी दिल्याचाही उल्लेख निवेदनात करण्यात आला आहे. स्थानिक आदिवासींच्या जल, जंगल आणि जमिनीवर या प्रकल्पामुळे घाला येणार असून, त्यांच्या उपजीविकेवर थेट परिणाम होईल, अशी भीती ग्रामस्तरीय सनियंत्रण समितीचे अध्यक्ष तोंदे सुकू कातवो, सचिव पप्पू लिंगू कातबी आणि ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
भारतीय संविधानातील पाचवी अनुसूची, पेसा कायदा (१९९६) आणि वन हक्क कायदा (२००६) यांचा आधार घेत ग्रामसभेच्या पूर्वसंमतीशिवाय अनुसूचित क्षेत्रात कोणतेही सर्वेक्षण अथवा उत्खनन करणे बेकायदेशीर असल्याचे ग्रामसभेने ठामपणे नमूद केले आहे. दरम्यान, या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाकडून होत असलेल्या सातत्यपूर्ण दुर्लक्षामुळे ग्रामस्थांमध्ये संताप उसळला आहे. २७ मार्च रोजी उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांच्याकडे लेखी तक्रार देऊनही कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. उलट, ८ एप्रिल रोजी वनपरिक्षेत्रातील कंपार्टमेंट क्रमांक २१९ मध्ये ड्रिलिंग मशीन आणण्यात आल्याचे समोर आल्याने परिस्थिती अधिकच चिघळली आहे. प्रशासनाच्या निष्क्रिय भूमिकेमुळे आता हा प्रश्न केवळ तक्रारींपुरता मर्यादित न राहता संघर्षाच्या उंबरठ्यावर पोहोचला असून, येत्या काळात आंदोलन तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.








