पुण्यात पुन्हा टोळीयुद्ध भडकले!
आंदेकर-कोमकर गँगच्या जुन्या वैरातून अक्षय उर्फ बाळा म्हस्केची निर्घृण हत्या; बालाजीनगर परिसर हादरला
उपसंपादक:- गणेश महाडिक
दिनांक २०/०५/२०२६ पुणे शहरात पुन्हा एकदा टोळीयुद्धाने डोके वर काढल्याचे समोर आले असून, आंदेकर आणि कोमकर टोळीतील जुन्या वादातून एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अक्षय उर्फ बाळा म्हस्के असे खून झालेल्या तरुणाचे नाव असून, ही घटना बालाजीनगर बस स्टँड परिसरात घडली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, आंदेकर आणि कोमकर टोळीतील वर्चस्वाच्या जुन्या वादातून हा हल्ला झाल्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे. आरोपींनी अक्षय म्हस्के याच्यावर धारदार शस्त्रांनी वार करत त्याची हत्या केल्याची माहिती समोर येत आहे. हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिसराचा ताबा घेतला. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली असून सीसीटीव्ही फुटेज, स्थानिक नागरिकांचे जबाब आणि तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपींचा शोध सुरू करण्यात आला आहे.
या प्रकरणी पोलीस उपायुक्त (गुन्हे) गौहर हसन यांनी प्राथमिक माहिती देताना सांगितले की, “घटनेचा सर्व बाजूंनी तपास सुरू असून आरोपींचा लवकरच माग काढण्यात येईल.” पोलिसांनी काही संशयितांची माहितीही गोळा केल्याचे समजते.
दरम्यान, पुण्यात गेल्या काही महिन्यांत वाढत्या गुन्हेगारी घटनांमुळे शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. भरदिवसा घडलेल्या या खुनामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिस प्रशासनावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे








