वाठार स्टेशनमध्ये वाहतूक पोलिसांच्या कारभाराबाबत नागरिकांच्या तक्रारी; वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेण्याची मागणी.
वाहनधारकांना त्रास, पैशांच्या मागणीचे आरोप; कार्यपद्धतीबाबत नागरिकांमध्ये नाराजी!
(सातारा जिल्हा ) प्रतिनिधी.
वाठार स्टेशन पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी तीन वाहतूक हवालदार कार्यरत आहेत. मात्र, या कर्मचाऱ्यांच्या कार्यपद्धतीबाबत काही वाहनधारक व नागरिकांकडून गंभीर स्वरूपाच्या तक्रारी पुढे येत असून, या प्रकरणाची वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी गांभीर्याने दखल घेऊन वस्तुनिष्ठ चौकशी करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
वाहतूक नियमांची अंमलबजावणी करताना सर्व वाहनधारकांशी समान व कायदेशीर पद्धतीने वागणे अपेक्षित असताना, काही वाहनधारकांना वारंवार अडवून त्रास दिला जात असल्याच्या तक्रारी आहेत. तसेच दंडात्मक कारवाईव्यतिरिक्त विविध कारणांनी पैशांची मागणी केली जात असल्याचेही काही नागरिकांचे म्हणणे आहे. या आरोपांची सत्यता संबंधित विभागाच्या चौकशीतून स्पष्ट होणे आवश्यक आहे.
दरम्यान, काही वाहतूक कर्मचाऱ्यांचे स्थानिक राजकीय व्यक्तींशी असलेले संबंध आणि उठबस याबाबतही नागरिकांमध्ये चर्चा आहे. पोलिस कर्मचाऱ्यांनी कोणत्याही राजकीय पक्षाच्या किंवा गटाच्या प्रभावापासून दूर राहून निष्पक्षपणे कायदा व सुव्यवस्था राखणे अपेक्षित असताना, राजकीय व्यक्तींशी जवळीक असल्याचे चित्र निर्माण झाल्यास त्याचा जनमानसावर विपरीत परिणाम होऊ शकतो.
यातील एका वाहतूक हवालदाराच्या वर्तणुकीबाबत नागरिकांमध्ये विशेष नाराजी असल्याचे समोर येत आहे. संबंधित कर्मचारी आपल्या पदाच्या शिस्तीपेक्षा एखाद्या ‘सेलिब्रिटी’प्रमाणे वावरत असल्याची भावना काही नागरिकांनी व्यक्त केली आहे. चौकाचौकात तरुणांच्या घोळक्यात बसून गप्पा मारणे, तसेच पोलिस कर्मचाऱ्याला अपेक्षित असलेल्या शिस्तीबाबत प्रश्न निर्माण करणारे वर्तन होत असल्याच्या तक्रारीही आहेत.
पोलिस ठाण्यात विविध कामांसाठी येणाऱ्या गरीब व सर्वसामान्य नागरिकांशी सन्मानपूर्वक वागणे ही पोलिस यंत्रणेची मूलभूत जबाबदारी आहे. अनेक वाहनधारकांनी कर्ज काढून वाहने घेतलेली असून, त्यावरच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. अशा परिस्थितीत वाहतूक नियमांचे उल्लंघन झाल्यास नियमानुसार कारवाई होणे आवश्यक आहे; मात्र, अनावश्यक त्रास किंवा बेकायदेशीर आर्थिक मागणी होत असल्यास त्याची चौकशी होणे गरजेचे आहे.
‘चोर सोडून संन्याशाला फाशी’
अशी भावना निर्माण होऊ नये
कायदा हा सर्वांसाठी समान असला पाहिजे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करताना आर्थिक किंवा राजकीय प्रभाव असलेल्या व्यक्तींना वेगळा न्याय आणि सर्वसामान्य वाहनधारकांना वेगळा न्याय मिळत असल्याची भावना निर्माण झाल्यास पोलिस प्रशासनावरील नागरिकांचा विश्वास कमी होऊ शकतो. त्यामुळे वाहतूक कारवाईत पारदर्शकता आणि समानता राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
या सर्व तक्रारींची सत्यता तपासण्यासाठी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी संबंधित वाहतूक कर्मचाऱ्यांच्या कार्यपद्धतीची वस्तुनिष्ठ चौकशी करावी. दोष आढळल्यास नियमानुसार कारवाई करावी अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत.
वाठार स्टेशन परिसरातील नागरिकांच्या मनातील नाराजी दूर करण्यासाठी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी केवळ समज देण्यापेक्षा आवश्यक असल्यास प्रत्यक्ष आढावा घेऊन वाहतूक विभागाच्या कामकाजात पारदर्शकता, शिस्त आणि नागरिकाभिमुखता आणावी, अशी मागणी जोर धरत आहे.








