पगाराचे पैसे मागितल्याच्या रागातून वॉचमनची काठीने मारहाण करून हत्या; मुक्ताईनगर तालुक्यातील घटना
उप संपादक | प्रणित काठोके
पगाराचे थकीत पैसे मागितल्याच्या कारणावरून हॉटेल मालकाने वॉचमनला रस्ता ओलांडून गॅरेजमध्ये नेऊन लाकडी काठीने डोक्यात गंभीर मारहाण केली. उपचारादरम्यान या वॉचमनचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, मृत गोकूळ तारासिंग जाधव (वय ५०, रा. निंभोरा, ता. रावेर, जि. जळगाव) हे बुरहानपूर हायवेवरील उचंदा शिवारातील ‘शेर-ए-पंजाब’ ढाब्यावर मागील ५ महिन्यांपासून वॉचमन म्हणून काम करत होते. तर त्यांच्या पत्नी सुमित्राबाई जाधव (वय ५५) या त्याच हॉटेलमध्ये पोळ्या बनवण्याचे काम करत होत्या. ढाबा मालक कमलजीतसिंग प्रितमसिंग याने गेल्या २-३ महिन्यांपासून पती-पत्नी दोघांचाही पगार दिला नव्हता.
दिनांक १ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री १ वाजेच्या सुमारास गोकूळ जाधव यांनी कमलजीतसिंग यांच्याकडे आपल्या हक्काच्या पगाराचे पैसे मागितले. यावरून संतापलेल्या कमलजीतसिंग याने गोकूळ जाधव यांना रस्त्याच्या पलीकडे असलेल्या गॅरेजजवळ नेले आणि तेथे त्यांच्या डोक्यात लाकडी काठीने जोरदार प्रहार केला.
या मारहाणीत गोकूळ जाधव यांच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्त निघू लागले आणि ते तेथेच बेशुद्ध पडले. यानंतर आरोपी हॉटेल मालक हॉटेलमध्ये येऊन बसला.
ही माहिती मृत व्यक्तीच्या पत्नीला मिळतात पत्नीने पतीकडे धाव घेतली व जखमी गोकूळ जाधव यांना तातडीने प्रथमोपचार देऊन पुढील उपचारासाठी भुसावळ व तेथून बुरहानपूर येथील जिल्हा सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच २ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री ११:४५ वाजेच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.
याप्रकरणी मृत गोकूळ जाधव यांच्या पत्नी सुमित्राबाई जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात आरोपी कमलजीतसिंग प्रितमसिंग याच्याविरोधात भादंविच्या संबंधित कलमान्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.








