तक्रार दाखल होऊन महिनाभर उलटला; तरीही कारवाई शून्य! मुक्ताईनगर नगरपंचायतीत जबाबदारीची चेंडूफेक, नागरिकांना न्याय कोण देणार?
मुक्ताईनगर | उप संपादक प्रणित काठोके
मुक्ताईनगर नगरपंचायतीच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे प्रकरण समोर आले आहे. एक लेखी तक्रार एका नागरिकाने दि. १ जुलै २०२६ रोजी नगरपंचायतीकडे दाखल केली. मात्र २७ दिवस उलटूनही या तक्रारीवर कोणतीही ठोस प्रशासकीय कारवाई झालेली नसल्याने तक्रारदाराने पुन्हा मुख्य अधिकाऱ्यांना याबाबत स्मरण तक्रार पत्र दिले त्यानंतरही अद्याप पर्यंत कारवाई झालेली नाही. असा आरोप तक्रारदाराने केला आहे.
तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, पहिल्या तक्रारीनंतरही कोणतीही कार्यवाही न झाल्याने नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांना स्मरणपत्र देण्यात आले. त्यानंतर मुख्याधिकाऱ्यांशी प्रत्यक्ष चर्चा केली असता, “संबंधित अर्ज बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात आला असून ते आवश्यक ती कारवाई करतील,” असे सांगण्यात आले.
मात्र बांधकाम विभागाकडे चौकशी केली असता, “ही तक्रार आमच्या कार्यक्षेत्रातील नाही. हा विषय आरोग्य व पाणीपुरवठा विभागाचा आहे,” असे उत्तर देण्यात आले. त्यानंतर आरोग्य व पाणीपुरवठा विभागाशी संपर्क साधला असता, “हा विषय आमच्या कार्यक्षेत्रात येत नाही,” असे सांगण्यात आले.
यामुळे एकाच तक्रारीवर दोन विभागांनी जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केल्याचे चित्र समोर आले आहे. त्यामुळे नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी नेमका जबाबदार अधिकारी कोण, असा मूलभूत प्रश्न निर्माण झाला आहे.
विशेष म्हणजे, महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायत व औद्योगिक नगर अधिनियम, 1965 अंतर्गत सार्वजनिक आरोग्य, स्वच्छता, जलनिस्सारण व उपद्रव प्रतिबंधासंदर्भात नगरपंचायतीवर वैधानिक जबाबदाऱ्या आहेत. अशा परिस्थितीत नागरिकाच्या लेखी तक्रारीवर महिनाभर कोणतीही ठोस कारवाई न होणे आणि विभागांकडून परस्परविरोधी उत्तरे मिळणे, यामुळे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित होत आहेत.
तक्रारदाराने असा सवाल उपस्थित केला आहे की, मुख्याधिकाऱ्यांचे आदेश प्रत्यक्षात अंमलात का येत नाहीत? विभागांमध्ये समन्वयाचा अभाव आहे का? की नागरिकांच्या तक्रारी केवळ कागदावरच फिरत आहेत?
आता या संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ स्तरावर चौकशी करून जबाबदारी निश्चित केली जाईल का, नागरिकाला न्याय मिळेल का, आणि नगरपंचायत प्रशासन यावर ठोस भूमिका घेईल का, याकडे मुक्ताईनगरकरांचे लक्ष लागले आहे.








