वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी इतिहास रचत भिवंडीच्या एका तरुणाने संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले आहे. कोणतीही महागडी शिकवणी न लावता, केवळ स्वतःच्या जिद्दीच्या आणि मेहनतीच्या बळावर पहिल्याच प्रयत्नात यूपीएससीसारख्या कठीण परीक्षेत अभूतपूर्व यश मिळवून अभिजीत पाटील आता थेट आयपीएस अधिकारी बनले आहेत.
ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील दापोडे गावचे रहिवासी असलेल्या अभिजीत यांनी सिव्हिल आणि एन्व्हायर्नमेंटल इंजिनीअरिंगचे शिक्षण घेतानाच या प्रवासाची सुरुवात केली होती. बी.टेकच्या शेवटच्या वर्षात शिकत असतानाच त्यांनी पूर्व परीक्षा तर उत्तीर्ण केलीच, पण मुख्य परीक्षेतही पहिल्याच झटक्यात देशात ४७० वी रँक पटकावून खाकी वर्दीचे स्वप्न सत्यात उतरवले.
अभिजीत यांचे वडील मुंबई महानगरपालिकेत मुख्य लेखापरीक्षक म्हणून कार्यरत होते, तर आई सिंचन विभागात सरकारी सेवेत आहे. घरातून मिळालेले संस्कार, योग्य पाठबळ आणि स्वतःची अहोरात्र मेहनत यांमुळेच त्यांना हे यश गाठता आले. राजस्थान केडर मिळालेले अभिजीत हे सध्या देशातील सर्वात तरुण आयपीएस अधिकाऱ्यांपैकी एक म्हणून ओळखले जात आहेत.
ग्रामीण भागातील मुलेही मोठी स्वप्ने पाहून ती स्वबळावर पूर्ण करू शकतात, हे अभिजीत यांनी सिद्ध केले आहे. त्यांच्या या उत्तुंग यशामुळे भिवंडी परिसर आणि ठाणे जिल्हाची मान अभिमानाने उंचावली आहे








