कुरनूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू, नागरिकांना सतर्कतेचा इशारा
प्रतिनीधी गोपाळ भालेराव
अक्कलकोट – तुळजापूर, बोरी व हरणा नदी क्षेत्रात गेल्या दोन दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे कुरनूर धरणाची पाणीपातळी जून महिन्याच्या सुरुवातीलाच 96% इतकी भरली आहे. त्यामुळे धरणातून आज दुपारी 2:45 वाजता तीन दरवाजे उघडून 450 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे, अशी माहिती पाटबंधारे विभागाने दिली आहे.
या धरणावर अक्कलकोट, दुधनी, मैंदर्गी यांच्यासह ५१ गावांचा पाणीपुरवठा अवलंबून आहे. तसेच प्रशासनाने सर्व नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. तर नदीकाठच्या गावांनी विशेष काळजी घ्यावी, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
पुढील पावसाचा जोर लक्षात घेता धरणातून पाण्याचा विसर्ग आणखी वाढण्याची शक्यता आहे. नागरिकांनी नदीपात्राजवळ जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
