प्रतिनिधी : सतिश कडु
नागपूर, ५ जून – पारशिवनी तालुक्यातील आमडी ग्रामपंचायतीत मनरेगा आयुक्त डॉ. भरत बास्टेवाड यांच्या उपस्थितीत अमृत सरोवर परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला. पर्यावरण संवर्धन आणि हरित महाराष्ट्राच्या दिशेने ग्रामस्थांच्या सहभागातून महत्त्वाचे पाऊल उचलले गेले.
आयुक्त डॉ. बास्टेवाड यांनी “वृक्ष हेच जीवन” या संकल्पनेतून सर्वांना पर्यावरण रक्षणासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले. कार्यक्रमात महिला बचत गटांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. महिलांच्या सक्षमीकरणामुळे सामाजिक परिवर्तन शक्य असल्याचे ते म्हणाले. मनरेगा अंतर्गत महिलांनी कामांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
यानंतर, आयुक्तांनी पारशिवनी तालुक्यातील बनपुरी व मौदा तालुक्यातील निसदखेडा ग्रामपंचायतींना भेट देत संपादित कामांची पाहणी केली. त्यांनी सरपंचांशी संवाद साधत मनरेगा अंतर्गत सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतला.
या दौऱ्यात आयुक्तांनी दुतर्फा वृक्ष लागवड, फळबाग प्रकल्प, सिंचन विहीर, सिमेंट काँक्रीट रस्ते आदी कामांची प्रत्यक्ष पाहणी केली. ग्रामविकासाची पारदर्शकता आणि गुणवत्ता वाढवणे हा यामागील उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमाला उपायुक्त (मनरेगा) श्री. अरविंद उपरीकर, उपजिल्हाधिकारी (रोहयो) श्रीमती स्वाती देसाई, गटविकास अधिकारी श्रीमती वंदना भेले, श्री. सुभाष जाधव, राज्य एमआयएस समन्वयक श्री. अभय तिजारे, आयसी समन्वयक श्री. संकेत रामराजे तसेच अन्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
