प्रतिनिधी : सतिश कडु
नागपूर, दि. ५ जून – राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) अद्ययावत करून त्यामार्फत तंत्रकुशल युवक घडवण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र शासनाने नवे धोरण स्वीकारले असून, खासगी कंपन्यांनी या प्रक्रियेत विश्वासाने सहभागी व्हावे, असे आवाहन कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केले आहे.
चिटणविस सेंटर, नागपूर येथे पार पडलेल्या परिसंवादात ते बोलत होते. यावेळी रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ. अपूर्वा पालकर, ॲडव्हांटेज विदर्भचे अध्यक्ष आशिष काळे, तसेच विविध उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी उपस्थित होते.
राज्यात सुमारे 418 शासकीय व 600 खासगी आयटीआय संस्था आहेत. नव्या धोरणाद्वारे या संस्थांना सार्वजनिक-खासगी भागीदारीतून उद्योगांच्या गरजेनुसार प्रशिक्षण देण्यासाठी सक्षम केले जाणार आहे. लोढा म्हणाले की, “जागतिक दर्जाचे प्रशिक्षण देणारी केंद्रे उभारण्याचा सरकारचा हेतू आहे.”
विदर्भात येणाऱ्या नव्या उद्योगांना आवश्यक तंत्रकुशल मनुष्यबळ या धोरणातूनच तयार होईल, असा विश्वास आशिष काळे यांनी व्यक्त केला. मानव संसाधनात गुंतवणूक ही सतत चालणारी प्रक्रिया असून, सर्व घटकांनी एकत्रित प्रयत्न केल्यास मनुष्यबळाचा प्रश्न सुटू शकतो, असे कुलगुरु डॉ. पालकर म्हणाले.
कार्यक्रमात उद्योजकांशी थेट संवाद साधण्यात आला. औद्योगिक संस्थांच्या प्रतिनिधींचा सत्कार करण्यात आला आणि सहसंचालक किरण मोटघरे यांनी आभार मानले
