प्रतिनिधी : ज्योत्स्ना करवाडे नागपूर येथे अंधश्रद्धा निर्मूलन महिला परिषद उत्साहात संपन्न.
समाजातील पुरुष सत्ताक व्यवस्था बदलाच्या दृष्टीने स्त्रियांनी काम करणे आजच्या काळाची गरज आहे. यावर्षी भारतातील स्त्री चळवळीला ५० वर्षे पूर्ण होत आहे. पुरुष सत्ता, भांडवलशाही आणि जातीव्यवस्था अशा तिहेरी जोखडात मध्ये आजची स्त्री अडकली आहे असे प्रतिपादन सामाजिक प्रश्नांचे अभ्यासक रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ यांनी व्यक्त केले. ते नागपूर येथे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे आयोजित केल्या गेलेल्या दोन दिवसांच्या राज्य महिला परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. या महिला परिषदेसाठी महाराष्ट्राच्या १४ जिल्ह्यातील जवळपास १८० महिलांनी सहभागी झाल्या होत्या.
रविंद्र रुक्मिणी पंढरीनाथ पुढे म्हणाले की, सध्या जात-धर्म भांडवलशाही व्यवस्था अतिशय मजबूत झाल्यात.आज पुनश्च एकदा आपण प्रतिक्रांतीच्या उंबरठ्यावरती येवून ठेपलेलो आहोत .अशा वेळी पुरोगामी चळवळी मात्र दुभंगल्या आहेत. त्यामुळे सर्वांनी एकत्र येऊन काम करणे गरजेचे आहे.
अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्या मुक्ता दाभोलकर म्हणाल्या की, मुलाला जन्म देण्या व्यतिरिक्त बाई मध्ये कुठलंही जैविक नसतं! ती शोषिक असते, ती सहनशील असते, ती घरातल्याच कार्या पूरती मर्यादित असते वगैरे ही जैविकता तिला नंतर चिटकवली जाते. याच पुरुषसत्ताक व्यवस्थेतून बाईच जगणं हे अधिक अंधश्रद्ध बनतं. बाई तशी घडवली गेलेली आहे व त्यातून तीने अंधश्रद्धांची निवड केलेली असते. अशा वेळी “क्रोधापेक्षा करुनेची आणि उपहासापेक्षा आपुलकीची गरज असते” या डॉ नरेंद्र दाभोलकर मार्गदर्शक तत्त्वानुसार काम करणे गरजेचे आहे. यापुढे संपूर्ण महाराष्ट्रात अशा महिला परिषदा आयोजित करुन ‘अंनिस’ ची चळवळ पुढे नेवूया असे मत त्यांनी शेवटी व्यक्त केले.
समाजात वावरतांना छोट्या छोट्या गोष्टीमधूनही कशा अंधश्रद्धा पसरवल्या जातात याचे मार्मिक दाखले राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचाराचे भाष्यकार ज्ञानेश्वर रक्षक यांनी सांगितले.
तर उद्घाटनाच्या अध्यक्षीय भाषणातून आपले विचार मांडताना पत्रकार संध्या राजूरकर म्हणाल्या की,
महिलांकडे बघण्याची दृष्टी आपल्याला आपल्या कृतीतून बदलावी लागेल. पुरुषसत्ताक व्यवस्थेने लाभलेली बंधने झुगारून द्यावी लागतील ” जिच्या हाती शिक्षणाची दोरी ती जगाला उधारी ” या तत्त्वानुसार काम करावे लागेल. पाळण्याची दोरी तिच्या हातून काढून तीला तिचं आयुष्य जगू द्या,
असे रोखठोक मत दैनिक सौरभच्या संपादिका संध्या राजूरकर यांनी मांडले.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी उंबरठा ओलांडून शिक्षणाचे दारे उघडे करून दिली म्हणून आज आपण अंधश्रद्धा निर्मूलनासारख्या कामाबाबत बोलू शकतो.
तर संविधानाच्या माध्यमातून या देशातील सर्व जाती-धर्माच्या महिलांना डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांनीच स्वातंत्र्य मिळवून दिले असे ठाम प्रतिपादन संध्या राजूरकर यांनी अध्यक्षीय भाषणात केले.
या महिला परिषदेचा समारोप करताना सामाजिक समाज कल्याण विभाग नागपूरचे उपायुक्त सिद्धार्थ गायकवाड यांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्याचा गौरव केला. जादूटोणाविरोधी कायदाच्या वाटचालीचा आढावा त्यांनी घेतला. हा कायदा पारित होताना किती अडचणी आल्या,त्यावर डॉ. नरेंद्र दाभोलकरांनी कसा मार्ग काढला. कायद्याच्या किती वर्ष पाठपुरावा केला याचा पाढाच त्यांनी वाचला.
उपायुक्त गायकवाड पुढे म्हणाले की, महाराष्ट्र शासनाने कायदा तर केला परंतु त्याच्या प्रचाराचे काम शासनाकडून एकही पैसा न घेता महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती करते आहे असे गौरोद्गगार त्यांनी या निमित्ताने काढले.
राज्यस्तरीय महिला मेळाव्याच्या समारंभाच्या दिवशी महिला सक्षमीकरणाचा विचार लक्षात घेऊन चार ठराव पारित करण्यात आलेत. ते ठराव असे 1.महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या आम्ही सर्व कार्यकर्त्या रोज किमान एका नवीन महिलेशी अंधश्रध्दा निर्मूलनाशी संबंधित व्रतवैकल्ये, रुढी परंपरा, अंगात येणे, बुवाबाजी, करणी, भानामती अशा कोणत्या ना कोणत्या विषयाबद्दल किमान 15 मिनिटे गप्पा मारून संवाद साधू. तसेच आम्ही अंधश्रद्धेच्या बळी व्यक्तींची आवर्जून भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधू.
2. भोवतालचा समाज व जग अधिक समजून घेण्यासाठी आम्ही रोज किमान अर्धा तास वैचारीक वाचन करू.
3. विधवा प्रथेमुळे महिलांच्या वाट्याला दुःख व अवहेलना येते. अशा विधवा प्रथेचे निर्मूलन करण्यासाठी आम्ही सतत प्रयत्न करू.
4. महाराष्ट्रातील जादूटोणा विरोधी कायद्याप्रमाणे देशव्यापी कायदा व्हावा यासाठी प्रयत्न करणे.
या परिषदेचे संयोजन अंनिसच्या महिला विभागाच्या उषा शहा,नंदिनी जाधव, नीता सामंत,नीशा भोसले यांनी केले. तर या परिषदेचे यशस्वी आयोजन करण्यासाठी नागपूर जिल्हा अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते रामभाऊ डोंगरे, विजयाताई श्रीखंडे, देवयानी भगत, पुष्पा घोडके, विजया ठाकरे सुषमा शेवडे, वर्षा सहारे, चंदा मोटघरे, शोभा पाटिल, इंदु उमरे, रंजना ठवरे, शोभा तिरपुडे, वंदना सहारे, चितरंजन चौरे, गौतम पाटील,डॉ. सुनील भगत,देवानंद बडगे, विभूतीचंद्र गजभिये, चंद्रशेखर मेश्राम, डॉ. विकास होले, अरविंद तायडे, कमलाकर सतदेवे यांनी परिश्रम घेतले. हम होंगे कामयाब या गीताने महिला परिषदेची सांगता झाली.
