अजिंक्य महाराष्ट्र न्यूज – एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात.
प्रतिनिधी : गोपाळ भालेराव.
🔹 आरोग्य विभागात कायमस्वरूपी नोकरी मिळवून देण्याचे आमिष.
🔹 हजारो आरोग्य कर्मचाऱ्यांची फसवणूक. धक्कादायक प्रकार.
नागपूर प्रतिनिधी दि:२०/१२/२०२४:- महाराष्ट्रातील राष्ट्रीय आरोग्य अभियानात हजारो आरोग्य कर्मचारी अल्पशा मानधनावर काम करित असलेल्या कर्मचाऱ्यांनी आपल्या न्याय हक्क, आणि अधिकार मिळवून घेण्यासाठी अनेक वर्षांपासून ठिकठिकाणी आंदोलन केले. परंतु महाराष्ट्रात त्यांना न्याय देण्यासाठी सरकार अपयशी ठरले आहे. महाराष्ट्रातील आरोग्य विभागात कायमस्वरूपी समायोजन करुन नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून भंडारा, गडचिरोली जिल्ह्यासह महाराष्ट्रातील हजारो आरोग्य कर्मचाऱ्यांची फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संपुर्ण महाराष्ट्रातील हजारोंच्या वर कर्मचाऱ्यांकडून संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी लाखों रुपये उकळल्याचा आरोप सैनिक समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष चक्रधर मेश्राम , साकोली विधानसभा संघाचे प्रभारी डॉ अजय तुमसरे यांनी केला आहे. कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या या आरोग्य कामगारांपैकी अनेकांनी या फसवणुकीबद्दल संताप आणि निराशा व्यक्त केली आहे.
ग्रामीण ते शहरी भागात आरोग्य केंद्रे आणि उपकेंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. या ठिकाणी आरोग्य कर्मचारी विविध पदांवर कार्यरत आहेत. मात्र,१० ते १५ वर्षे सेवा बजावूनही या कंत्राटी कामगारांना शासकीय लाभ आणि नोकरीच्या सुरक्षिततेपासून वंचित ठेवण्यात आल्याने त्यांच्यात असंतोष पसरला आहे. त्यातच आरोग्य विभागात कायमस्वरूपी पदे मिळवण्यासाठी त्यांच्याकडून प्रति व्यक्ती ७५,००० ते एक लाख रुपये उकळल्याचा आरोप काही आरोग्य कर्मचाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर केला आहे.
दहा वर्षांहून अधिक काळ काम केलेले आहे त्यांनाच कायमस्वरूपी केले जाईल असा आदेश सरकारने जारी करण्यापूर्वी ही रक्कम गोळा करण्यात आली होती असे काही कर्मचाऱ्यांनी सावधगिरी बाळगत दबक्या आवाजात सांगितले. नऊ महिन्यांपूर्वी रक्कम भरूनही अनेक कामगारांना अद्यापही नियमित करण्यात आलेले नाही, त्यामुळे ते हताश आणि चिंतेत आहेत. हा पैसा नागपुरात एका मंत्र्याला देण्यात आल्याची चर्चा सुरू आहे. हा पैसा घेणारा लुटारु मंत्री कोण असु शकतो याबाबत मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे.
सैनिक समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष चक्रधर मेश्राम यांनी केलेल्या आरोपांनुसार गडचिरोली, भंडारा जिल्ह्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यातुन हजारोहून अधिक कंत्राटी कामगारांकडून कोट्यवधी रुपये वसूल करण्यात आले आहेत. धक्कादायक म्हणजे, काही आरोग्य कर्मचाऱ्यांनी दावा केला की त्यांनी ही देयके देण्यासाठी खाजगी सावकारांकडून उच्च व्याजदराने पैसे घेतले. काहींनी आपल्या ईपीएफ फंडातून पैसे काढून दिले आहेत आता, ते कर्जाची परतफेड आणि घरखर्चाचे व्यवस्थापन यांच्यात अडकले आहेत, मंत्री आणि सचिवांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नावाने ही रक्कम वसूल करण्यात आल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे. भ्रष्ट, फसवे सरकार भ्रष्टाचारमुक्त प्रशासनाचे स्वप्न दाखवत असतानाच हा कोट्यवधी रुपयांचा घोटाळा उघडकीस आला आहे. या घोटाळ्यामुळे संतापाची लाट उसळली असून, दोषींवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
एनआरएचएम अंतर्गत कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी करण्यासाठी महाराष्ट्रातील संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी मंत्र्यांना देण्याच्या नावावर कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून प्रत्येकी ७५ हजार रुपये प्रमाणे वसूल करुन कोट्यवधी रुपयांची अधिक माया जमविली. या भ्रष्टाचार प्रकरणात सरकारने लक्ष घालून सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांचा गोपनीय जबाब नोंदवून संबधित संघटनेच्या पदाधिकऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी सैनिक समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष चक्रधर मेश्राम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आणि संबंधित वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे केली आहे.
