प्रतिनिधी : सतिश कडु.
इगतपुरी, नाशिक | दि. ५ जून : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या अंतिम टप्प्याचे आणि ठाणे खाडी पूल क्रमांक तीन दक्षिण वाहिनीच्या लोकार्पण सोहळ्याचे उद्घाटन केले. दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे झालेल्या या सोहळ्यात राज्यातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, “हा महामार्ग राज्याच्या समृद्धीचा कॉरिडॉर ठरेल.” आता हा महामार्ग वाढवण बंदराशी जोडण्यात येणार असून त्यामुळे राज्याच्या २४ जिल्ह्यांचे जेएनपीटी व वाढवण बंदराशी थेट संपर्क साधला जाणार आहे.
महामार्गाचे वैशिष्ट्ये :
७०१ किमी लांबी, खर्च: ₹५५,३३५ कोटी
इगतपुरीतील ८ किमी लांबीचा बोगदा – राज्यातील सर्वात लांब व देशातील सर्वाधिक रुंदीचा
वन्यजीव संरक्षणासाठी १०० संरचना
सौर ऊर्जा (३५ मेगावॉट), जलपुनर्भरण, गॅस वाहिनी, शेततळी, वृक्षारोपण
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा महामार्ग पर्यावरण पूरक आणि विकासाला चालना देणारा गेमचेंजर असल्याचे सांगितले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पर्यावरण दिनानिमित्त १० कोटी रोपे लागवडीचे उद्दिष्ट जाहीर केले.
हा महामार्ग केवळ वाहतूकच नव्हे, तर कृषी, उद्योग, पर्यटन, पर्यावरण आणि संपूर्ण राज्याच्या विकासाचा केंद्रबिंदू ठरणार आहे.
