दहीहंडा पोलीसांची तत्पर कारवाई; हरवलेली ४ जनावरे शेतकऱ्यांच्या स्वाधीन
अकोट (प्रतिनिधी) निलकंठ वसु पाटील
– दहीहंडा पोलीस स्टेशन हद्दीत गेल्या दोन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात जनावरे हरवल्याच्या घटना घडत असल्याच्या बातम्या विविध वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित झाल्या होत्या. “वाचक लोकशाही”सह इतर माध्यमांनीही या प्रकरणाला वाचा फोडली होती.
या पार्श्वभूमीवर दहीहंडा पोलिसांनी तातडीने दखल घेत विशेष मोहीम राबवली. या मोहिमेदरम्यान पोलिसांनी शोधकार्य करत हरवलेली ४ जनावरे शोधून काढली असून ती संबंधित शेतकऱ्यांच्या स्वाधीन करण्यात आली आहेत. पोलिसांच्या या कारवाईमुळे परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
प्रतिक्रिया
आनंद डिक्कर (बजरंग दल) यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की,
“जनावरे हरवण्याच्या घटनांवर आळा घालण्यासाठी पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी. तसेच अवैध कत्तलखाने व मांस विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणे आवश्यक आहे.”
ठाणेदार गोपाल ढोले (दहीहंडा पोलीस स्टेशन) यांनी सांगितले की,
“शेतकऱ्यांनी जनावरे मोकळी सोडताना योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे. अवैध कत्तलखाने किंवा संशयास्पद हालचाली आढळल्यास त्वरित पोलिसांना माहिती द्यावी. आम्ही तत्काळ कारवाई करू. पोलीस दल हे जनतेच्या सेवेसाठी असून नागरिकांनी सहकार्य करावे.”








