मराठवाडयाचा स्वातंत्र्य संग्राम: मराठवाडा मुक्तीसंग्राम
इसवी सन १९३८ ते १९४८ हा मराठवाडा मुक्ती संग्रामाचा काळ म्हणून ओळखला जातो. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला, मात्र संपूर्ण देश विविध संस्थानांमध्ये विखुरलेला होता. भारत स्वतंत्र झाला तेव्हा अनेक संस्थांनी भारतात विलीन व्हायची बाकी होती ५६५ पैकी ५६२ संस्थानांनी स्वतंत्र भारतात सामील होण्याची सहमती दर्शवली आणि ही संस्थांनी स्वतंत्र भारतात विलीन झाली. उरलेली तीन संस्थान म्हणजे हैद्राबाद, काश्मीर आणि जुनागड ही संस्थांनी स्वतंत्र भारतात सामील व्हायची बाकी होती . हैद्राबाद संस्थानांमध्ये त्या काळात तेलंगणा सध्याचा मराठवाडा आणि कर्नाटक राज्यातील काही भाग होता तो मात्र अजून स्वतंत्र झाला नव्हता. त्यामुळे,
’उषःकाळ होता होता काळरात्र झाली,
अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली..’
अशी परिस्थिती मराठवाडा, तेलंगणा आणि कर्नाटकचा काही भाग ची होती. हैदराबाद संस्थानावर निजाम मीर उस्मान अली खान बहादूरनियामुद्दौला निजाम-उल मुल्क आसफजाह यांचे राज्य होते. त्यांच्या निजामांच्या राज्यातून मुक्त होऊन भारतीय संघराज्यात सामील होण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण हैदराबाद संस्थानात मुक्तीसंग्राम सुरु झाला होता. हैदराबाद संस्थानची त्यावेळची लोकसंख्या जवळपास १ कोटी ६० लाख होती. यात तेलंगणा, मराठवाडा आणि कर्नाटकचा कांही भाग येत होता.
मुक्ती संग्राम सुरु झाल्यावर निजामाचा सेनापती कासीम रझवी याने जनतेवर अनन्वित अत्याचार सुरु केले. दुसऱ्या बाजूला मुक्ती संग्राम वेगात सुरु झालेला होता. यांच नेतृत्व स्वामी रामानंद तीर्थ, दिंगबरराव बिंदू, गोविंदभाई श्रॉफ, रविनारायण रेड्डी, देवीसिंग चौहान,भाऊसाहेब वैशंपायन, विजयेंद्ग काबरा, बाबासाहेब परांजपे या आणि इतर अनेक नेत्यांकडे होते.
मराठवाडयाच्या गावागावात हा संग्राम लढला गेला. यात जीवाची पर्वा न करता अनेक स्वातंत्र्यवीर पुढे आले, यात मराठवाडयामध्ये निजामांच्या पंतप्रधानास रोखण्यासाठी पूल उडवून देणारे काशीनाथ कुलकर्णी, रोहिल्यांना जेरीस आणणारे बीडचे विठ्ठलराव काटकर, बर्दापूर पोलीस ठाणे उडवून देणारे लातूरचे हरिश्चंद्गजी जाधव, नळदूर्ग सर करणारे उस्मानाबाद जिल्हयातील होटी गावचे जनार्दन होर्टीकर गुरुजी तसेच परभणीत रझाकारांना हुसकावून लावणारे सूर्यभान पवार, विनायकराव चारठाणकर, विश्र्वनाथराव कातनेश्र्वरकर, नांदेड येथील देवरावजी कवळे, जीवनराव बोधनकर, मराठवाडयाची राणी लक्ष्मीबाई म्हणून प्रसिध्द झालेली बदनापूर तालुक्यातील धोपटश्र्वर गावची दगडाबाई शेळके आदींच्या रुपाने मराठवाड्याच्या कानाकोपज्यात स्वातंत्र्य संग्राम तेजस्वीपणे लढला गेला .
या मुक्ती संग्रामात श्रीधर वर्तक, जानकीलालजी राठी, शंकरराव जाधव, जालन्याचे जनार्दन मामा, किशनसिंग राजपूत , गोविंदराव पानसरे, बहिर्जी बापटीकर, राजाभाऊ वाकड, विश्र्वनाथ भिसे, जयंतराव पाटील आदींसारख्यांनी आपल्या जीवाची तमा न बाळगता काम केले. या सर्व हुतात्म्यांनी आणि मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्य सैनिकांनी केलेल्या संग्रामाचं मोल काढणं शक्य नाही.
’झेलत छातीवर वार
देह सोडला मातीसाठी,
अनेकांनी गमावले प्राण
मराठवाड्याच्या स्वातंत्र्यासाठी..’
शेवटी निजाम शरण येत नाही आणि नागरिकांवर अत्याचार वाढले आहेत हे पाहून १३ सप्टेंबर १९४८ रोजी पोलीस ऍक्शन सुरु झाले. मुख्य फौजा सोलापूर कडून घुसल्या. पहाटे चार वाजता ऑपरेशन सुरु झाल्यावर दोन तासात नळदुर्ग व सायंकाळपर्यंत तुळजापूर, परभणी ते मणिगढ, कनेरगाव, विजयवाड्याकडील बोनाकल ताब्यात घेतले. चाळीसगावकडून आलेल्या तुकडीने कन्नड, दौलताबाद तर बुलढाण्याकडील तुकडीने जालना शहर ताब्यात घेतले. दुसरीकडे वरंगल, बीदर विमानतळावर भारतीयफौजांनी हल्ले केले. १५ सप्टेंबर रोजी औरंगाबाद म्हणजे आताचे छत्रपती संभाजीनगर सर करुन फौजा पुढे निघाल्या. तेंव्हाकुठे निजामी सैन्य माघार घ्यायला लागले. हैदराबादचे सेनाप्रमुख जन अल इद्गीस यांनी १७ सप्टेंबर १९४७ रोजी शरणांगती स्वीकारली आणि खुद्द निजाम शरण आला. हैदराबाद मुक्ती संग्राम यशस्वी झाला. हैदराबाद संस्थानात तिरंगा फडकला.
’उगवली सोनेरी पहाट,
मिटला अंधार युगायुगांचा,
अन मराठवाड्याने ही पाहिला,
सोहळा स्वातंत्र्याचा..
अन मराठवाड्याने ही पाहिला,
सोहळा स्वातंत्र्याचा..’
हैदराबाद संस्थानातील अन्यायी राजवटीविरुध्दचा लढा मराठवाड्यातील जनतेनं यशस्वी केला. देश स्वतंत्र झाल्यानंतर एका वर्षानंतर खऱ्या अर्थाने आपण स्वतंत्र भारताचे नागरिक झालो. यामुळेच १७ सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन साजरा करण्यात येतो.
*लेखक: डॉ रमेश देविदास काळे, सहकार महर्षी माणिकराव पालोदकर महाविद्यालय पालोद*








