सतीश कडू नागपूर ग्रंथोत्सवाचे थाटात उद्घाटन साहित्य रसिकांसाठी दोन दिवसांची पर्वणी
नागपूर, दि. 11 : वाचकाला वाद, प्रतिवाद, संवाद करण्यास प्रवृत्त करत वर्ग आणि जात विचारांविरोधात भूमिका घेणारे ग्रंथ मराठी साहित्यात निर्माण व्हावे, अशा अपेक्षा ज्येष्ठ साहित्यिक डॉ. वि. स. जोग यांनी आज नागपूर ग्रंथोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केल्या.
ग्रंथालय संचालनालय, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय आणि विदर्भ साहित्य संघ यांच्या संयुक्त विद्यमाने विदर्भ साहित्य संघाच्या अमेय दालनात नागपूर ग्रंथोत्सवाचे डॉ.वि.स.जोग यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी ते बोलत होते. वरिष्ठ कोषागार अधिकारी मोनाली भोयर, विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते, साहित्य संघाचे सदस्य तथा कवी तिर्थराज कापगाते, प्रा. राजेंद्र मुंडे, राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डॉ. गजानन कोटेवार, राजाराम सिताराम दीक्षित वाचनालयाच्या अध्यक्ष ऋतुजा गडकरी, विभागीय माहिती केंद्राचे प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी रितेश भुयार, प्रभारी जिल्हा ग्रंथालय अधिकारी मिनाक्षी कांबळे यावेळी उपस्थित होते.
डॉ. जोग म्हणाले, ग्रंथ हे समाजाचे प्रतिबिंब असतात. समाजामध्ये घडणाऱ्या विविध चांगल्या वाईट गोष्टी ग्रंथांमध्ये उमटतात. त्यामुळे ग्रंथ निर्मिती करणारा लेखक हा समाज व्यवस्था जगणारा किंबहुना चळवळीत काम करणारा असावा. मराठी साहित्यातील श्रेष्ठ लेखकांच्या ओळीमध्ये बहुतेक लेखक चळवळीतून आल्याचे नमूद करत या प्रभावळीत साने गुरूजी, विं. दा. करंदीकर, वसंत बापट आदींचा उल्लेख त्यांनी केला. प्रत्येक मराठी घरांमध्ये साने गुरुजी लिखीत ‘श्यामची आई’, स्वातंत्र्यवीर सावरकर लिखीत ‘माझी जन्मठेप’ आणि ‘भारतीय राज्यघटना’ असावी अशा भावनाही त्यांनी व्यक्त केल्या. प्रसिद्ध गायक मोहम्मद रफी यांच्या जन्मशताब्दी वर्षाचा उल्लेख करून त्यांनी साहिर लुधीयानवी, शकील बदायुनी, हसरत जयपुरी, भरत व्यास या महान कविंच्या रचना घराघरात पोहचविल्याचे सांगितले. 2025 हे साने गुरूजींच्या जयंतीचे शतकोत्तर रौप्य महोत्सव असल्याचे सांगून साने गुरूजींनी विविध साहित्य प्रकारात 85 पुस्तक लिहून मराठी भाषेला मोठे योगदान दिले आहे. त्यांच्या या सर्व साहित्य लिखानात एकही अभद्र शब्द नसल्याचे अधोरेखित करत साने गुरूजी लिखीत ‘मोहम्मद पैगंबरांचे चरित्र’, ‘आपण सारे भाऊ भाऊ’ आणि ‘दिल्ली डायरी’ या अनुवादीत पुस्तकाविषयी डॉ. जोग यांनी विवेचन केले. ‘ग्रंथ कसे असावे’ या विषयी कवीश्रेष्ठ विं. दा. करंदीकर यांची ‘जनता अमर आहे’ ही कविताही त्यांनी सादर केली.
मोनाली भोयर, प्रदीप दाते, तिर्थराज कापगाते, साहित्यिक प्रा. राजेंद्र मुंडे, डॉ. गजानन कोटेवार, ऋतुजा गडकरी, रितेश भुयार यांनीही यावेळी विचार मांडले. मिनाक्षी कांबळे यांनी प्रास्ताविक केले व आभार मानले तर अर्चना गाजलवार यांनी सुत्रसंचालन केले. मान्यवरांच्या हस्ते ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटनही झाले. यावेळी विदर्भ साहित्य संघ व जिल्हा ग्रंथालय कार्यालयासह जिल्ह्यातील ग्रंथालयांचे ग्रंथपाल व कर्मचारी, ग्रंथप्रेमी उपस्थित होते.
तत्पूर्वी, जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी (माध्यमिक) रोहिणी कुंभार यांच्या हस्ते सिताबर्डी परिसरातील सेवा सदन शिक्षण संस्थेच्या प्रांगणात सकाळी 9 वाजता ग्रंथपूजन होवून ग्रंथदिंडी काढण्यात आली.
ग्रंथोत्सवाच्या पहिल्या दिवशी उद्घाटनानंतर पहिल्या सत्रात ‘भारतीय संविधानाची 75 वर्ष’ या विषयावर परिसंवाद झाला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापिठाच्या राज्यशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख विकास जांभुळकर, ऑरेंज सिटी समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महेंद्र मेश्राम, विचारवंत रविंद्र रूख्मिनी पंढरीनाथ आणि सामाजिक कार्यकर्ते ॲड. अतुल सोनक यांनी परिसंवादात सहभाग घेतला. दुसऱ्या सत्रात मंजुश्री डोंगरे यांनी ‘मी रमाई बोलतेय’ हा एकपात्री नाट्यप्रयोग सादर केला.
उद्या विविध साहित्यिक मेजवाणींसह ग्रंथोत्सवाचा समारोप.
बुधवार, 12 मार्च रोजी या ग्रंथोत्सवाचा समारोप होणार असून एक परिसंवाद आणि एकपात्री नाट्यप्रयोग सादर होणार आहे. पहिल्या सत्रात ‘वाचकांना घडविण्यासाठी साहित्यिक व ग्रंथालयाची भूमिका’ या विषयावर परिसंवाद होणार असून यात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापिठाचे ग्रंथपाल विजय खंडाळे, बिंझाणी नगर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र नाईकवाडे, जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार, लेखक-पत्रकार नितीन नायगांवकर हे विचार मांडणार आहेत. तर दुसऱ्या सत्रात पुजा पिंपळकर ‘व्हय, मी सावित्री बोलतेय’ हा एकपात्री नाट्यप्रयोग सादर करणार आहेत. ग्रंथोत्सवाच्या समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्ष वरिष्ठ कोषागार अधिकारी मोनाली भोयर असणार तर धर्मदाय उपायुक्त किशोर मसने, विदर्भ साहित्य संघाचे सरचिटणीस विलास मानेकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठलसिंग राजपुत, राजाराम सिताराम दिक्षीत वाचनालयाचे कार्यवाह अनिल चनाखेकर, विदर्भ साहित्य संघाचे ग्रंथालय संचालक प्रा. विवेक अलोनी आणि से.स.हा.कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्यध्यापक अजय चव्हाण उपस्थित राहणार आहेत.
